Friday, June 2, 2023

मृत्यू आपल्या नजीक...

काल पर्वा आपला GDP डाटा आला... आपण ग्रोथ केली... भारत विकास करतोय देश विकास करतोय... प्रगती होतेय... आपण विकसनशील देशाकडून विकसित होण्याकडे आणखी एक एक पाऊल पुढे टाकत आहोत...

पण आपण सुरक्षित आहोत का?

नाही मृत्यू प्रत्येक वेळी आपल्या आसपास आहे तो वाट बघतोय आपल्या एखाद्या चुकीची. कुणालाही माहीत नाही आपल्या आयुष्यात उद्या काय वाढून ठेवलंय.


ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील कोरोमण्डल रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233+ तर जखमींचा आकडा 900 पार पोहोचला आहे. अद्याप संपूर्ण डबे हटवण्याच कार्य सुरू असून मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढतच आहे.


दोन प्रवासी रेल्वे आणि एक मालगाडी अशा तीन रेल्वेच्या या भीषण अपघातात मृत्यू जरी 200 लोकांचा झाला असला तरी आयुष्य 200 कुटुंबांची उध्वस्त झाली आहेत. आपल्या घरातील एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असली तरी आपली तारांबळ उडते. तर विचार करा काल असलेली व्यक्ती आज घरात नसेल तर त्या 200 कुटूंबाची काय अवस्था असेल?

सरकार ने 10 लाखांची मदत घोषित केली, पण कुठपर्यंत पुरणार हे पैसे. त्या माणसांची त्यांच्या जाण्याने कुटूंबात निर्माण झालेली पोकळी भरून निघेल? पण तरीही ह्या अपघाताचं राजकारण करून येणाऱ्या अनेक निवडणुका लढवल्या जातील. पण ही मदत आणि ह्या अपघाताची वेळ आलीच कशी.. आणि का?

सध्या प्रथमदर्शी रेल्वे सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 3 रेल्वेगाड्यांची धडक झाल्याचं वृत्त आहे. खरच हे सत्य आहे का? जगातील चौथ्या क्रमांकावर भारतीय रेल्वे व्यवस्था मानांकित आहे आणि अशा मानांकित व्यवस्थेच्या सिग्नल मध्ये बिघाड होतो आणि इतका भीषण अपघात होतो की 200 कुटुंब उध्वस्त होतात.. खरंच? तांत्रिक बिघाड?


आपल्या भारतातील लोक टॅक्स भरण्यासाठी टाळाटाळ करण्याचं हे एक कारण नक्कीच असू शकत की कर भरून सुद्धा त्याच्या बदल्यात योग्य सुविधांची कमी आणि सुरक्षिततेची नो गॅरंटी!

आज माणसाचं आयुष्य काय आहे... दोन वेळ अगदी हेलथी जेवण आणि एक्ससाईज जरी करून जगलं तरी हार्ट अटॅक सारखी टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर आहे.. त्यातून वाचलो तर उष्णतेची लाट तर कधी अति वृष्टी महापूराचा धोका.. त्यातूनही वाचलो तर तांत्रिक बिघाड होऊन हे असे अपघात किंवा कृत्रिम हल्ले. त्यामुळे मृत्यू प्रत्येक वेळी आपल्यावर नजर रोखून आहे, आपल्या एका चुकीची वाट बघत आहे.

आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला आपली जीवनशैली बदलायला हवी. आणि सोबत सरकार व राजकारण सुद्धा बदलायला हवं. मैतावर उपचार कार्य करणार सरकार नको तर अशा दुर्घटना होणार नाहीत यासाठी प्रसतिबंधात्मक उपाय योजना आखणार सरकार हवं मग ते कोणत्याही पक्षाच असो!

नाहीतर हे असंच घडत राहणार. आपल्या हातात केवळ हेच उरत मग मेणबत्ती लावा आणि माझ्यासारख्यानी लिहून बातमी करा. पण लक्षात घ्या, हे आपल्या सोबत सुद्धा घडू शकत कधीही कुठेही कारण मृत्यू आपल्या नजीक आहे...


- रोh@nj




Monday, August 16, 2021

आत्महत्या शेवटचा मार्ग नाही, पण.....

 आत्महत्या शेवटचा मार्ग नाही, पण.....

आत्महत्या हा आजच्या घडीला लहानापासून ज्येष्ठांपर्यंत चर्चेचा विषय झालेला आहे. अगदी १२-१५ वर्षांच्या लहानग्यापासून मोठ्या थोरापर्यंत, विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत तर गरीबापासून फिल्म स्टार पर्यंत अशा अनेक घटना आपण ऐकल्या, पाहिल्या आहेत. अगदी एखाद्या संसर्गजन्य आजारा सारखाचं याचा प्रादुर्भाव वाढला आहे. महत्वाचं म्हणजे या आजारावर उपचारात्मक औषध कामी पडत नाही, कारण याचा रुग्ण शिल्लक राहिलेला नसतो. पण उपाययोजनात्मक औषध यावर नक्कीच काम करू शकत.

आयुष्य बहुदा ४ स्तंभांवर उभ असत. पहिला स्तंभ घर. दुसरा स्तंभ संसार. तिसरा स्तंभ करियर आणि चौथा स्तंभ आत्मविश्वास.

यातील पहिले तीन स्तंभ त्या प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व आहे, वेगळेपणा आहे आणि त्यातला एक जरी स्तंभ हलला तरी चौथा स्तंभ जो आयुष्यात खूपच महत्वाचा असतो तो कोसळतो.

थोडक्यात या 3 पैकी एक स्तंभ डगमगतो आणि चौथा स्तंभ कोसळतो. विचारधारा बदलू लागते, सगळे दरवाजे बंद झाल्याचं जाणवतं. हृदयाचे ठोके स्पीड पकडतात, डोकं जड होत, सगळी नकारात्मकता एकवटते, असंख्य आवाज प्रश्न बनून कानात वाजू लागतात आणि एकसात आवाज देतात संपव स्वतःला, मोकळं कर, आत्महत्या कर!

यावर येऊन सगळं थांबत आणि ती व्यक्ती हा शेवटचा मार्ग म्हणून चालू लागते. याला काही लोक डिप्रेशनच शेवटचं टोक असही म्हणतात तर काही लोक त्रासातून सुटला असंही म्हणतात. उपचारात्मक पद्धतीने यावर काही करणं कठीण आहे मग उपाययोजनात्मक काय करावं?

मुळात आत्महत्या हा काही एका दिवसात घेतलेला निर्णय नसतो. वारंवार एकाच गोष्टीचा, त्याच त्याच विषयाचा आघात मनावर होऊन ती व्यक्ती स्वतःला त्या विषयात इतकी जखडते की त्यातून सुटण्याचा तोच एक मार्ग दिसतो. मग तो कोणताही विषय असू शकतो.

घर म्हणजे आपली नाती. आपल्याच भल्यासाठी त्यांच एखादं टोचून बोलणं, वारंवार एखाद्या विषयासाठी अडवून धरण, एखादी गोष्ट करायला भाग पाडणं किंवा उलट दिशेला आपल्या चुकांमुळे आपण त्याचा विश्वास गमावण, आपल्याच घरच्यांच्या नजरेतून उतरण या अशा दोन्ही केस मध्ये एकतर सतत एखाद्या नकोशा असलेल्या गोष्टीचा भडिमार किंवा दुखावलेल्या स्वाभिमानामुळे हा पिलर डगमगतो आणि आपली विचारसरणी बदलते.

मग येतो संसाराचा स्तंभ. जो प्रेमाने भरलेला असतो. हा सगळ्या स्तंभात हळवा असलेला भाग. इथे सुई जरी टोचली तरी आभाळ कोसळल्या सारख वाटत. याचा पाया विश्वास, प्रामाणिकपणा आणि आदराने भक्कम असतो. पण जेव्हा प्रेमात विश्वास घात होतो, आपण प्रेम करणारी व्यक्ती अप्रामाणिक ठरते किंवा त्याच व्यक्तीकडून आपला आदर राखण्याजागी बदनामी होते अशा वेळी हा स्तंभ पूर्णपणे उखडून पडतो. उलटदर्शी आपण त्या व्यक्तीवर हदसे भी ज्यादा प्रेम करत असतो आणि ती व्यक्ती सोयी नुसार तुरळक प्रेम करत असते अशा वेळी सुद्धा आपल्या प्रेमावर खरी उतरायला ती व्यक्ती कमी पडली किंवा आपण हद्दी पेक्षा जास्तच गुंतलो असेल तर दुखावले जातो आणि अशा वेळी हा स्तंभ समूळ कोलमडून पडतो.

मग येतो करियरचा पिलर. यावर बोलणारे सतराशे साठ लोक आपल्या आसपास सतत असतात. काय करतोस, किती कमवतोस, पडूनच आहेस का रे? वगैरे वगैरे... जर एखादी उनाड व्यक्ती असेल तर तिला याचा फारसा फरक पडत नाही. मात्र एखादी व्यक्ती नोकरी असो व्यवसाय असो प्रयत्न करत असेल, धडपडत असेल तरीही तिला वारंवार अपयश येत असेल अशा वेळी अशा गोष्टींमुळे ती पूर्णतः खचून जाते. आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही अशी भावना निर्माण होते आणि एक वेळ येते शेवटचा मार्ग चालण्याची.

सगळ्यात शेवटी असतो तो आत्मविश्वास. आयुष्य जगण्यासाठी, एखादी गोष्ट करण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी लागतो तो आत्मविश्वास. या स्तंभाला स्वतःच स्वतंत्र अस्तित्व नसलं तरी सगळ्यात महत्वाचा स्तंभ असतो तो हाच. कारण पहिल्या तीन पैकी एक जरी स्तंभ डगमगला तरी कोसळतो तो आत्मविश्वास, जगण्याचा आत्मविश्वास!

त्यामुळे जर कधी कुणावर अशी वेळ आलीच, आयुष्याचे मूलभूत स्तंभ हलले तर स्वतःला एक प्रश्न विचारा,

"आपल्या डोक्यावर आर्थिक किंवा भावनांचं कर्ज तर नाही ना?"

आणि एक गोष्ट स्वतःला सांगा,

"अजून एक प्रयत्न करू देत!"

या एका प्रश्नाने आणि गोष्टीने नक्कीच काहीतरी फरक पडतो.

काही लोक अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या व्यक्तीचा आधार घेतात. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण, नवरा-बायको कोणीही असू शकते. आणि जेव्हा आपण या टोकाच्या निर्णयावर पोहोचतो त्यावेळी आपण अशाच एखाद्या व्यक्तीकडे आपला आधार शोधत असतो. "काही लोकांची सवयीचं असते प्रत्येक गोष्ट तिसऱ्या व्यक्तीकडे नेऊन रडगाणं करायचं, याचा त्याचा आधार घ्यायचं ती गोष्ट तो आधार सवयी असते ती वेगळी गोष्ट. त्याला स्वतःच्या आयुष्याचा बाजार मांडण म्हणतात." 

पण जेव्हा आत्महत्ये सारखी अशी वेळ आयुष्यात क्वचित एखादं दुसरे वेळी येते त्यावेळी आपण याचा त्याचा आधार शोधत नाही, पण कुणीतरी एक व्यक्ती नक्कीच असते जीच्यासोबत आपल्याला बोलावं वाटत, आणि त्याच्या सोबत चर्चा करावी वाटते. ती हक्काची आणि हाकेला धावणारी व्यक्ती जर तुमच्या सोबत त्या क्षणी असेल तर ही वेळ नक्कीच टळते. फक्त ती व्यक्ती त्या पात्रतेची, तुम्हाला संकट काळात पाहून जीवाला जीव देणारी आणि वेळ पडली तर मृत्यूला स्वतः सामोरी जाणारी विश्वास पात्र खरी असावी. आणि अशी एक तरी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते. आणि अशा वेळी ती व्यक्ती तारणहार ठरू शकते. पण जर अशी व्यक्ती निवडायला आपण चुकलो आणि ती व्यक्ती त्या लायक नसली आणि अशा कठीण काळात देखील ती दुरून तुम्हाला उपदेश देऊ लागली तर मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत शेवटी अनर्थ घडायचा तोच घडतो!

त्यामुळे एकतर विश्वासपात्र एक व्यक्ती तुम्हाला अशा काळात जपायची आहे नाहीतर स्वतःशी दोन गोष्टी बोलायच्या आहेत. जर चौथा स्तंभ पुन्हा उभा राहिला तर पुन्हा नव्याने सुरुवात होते अन्यथा आत्महत्या शेवटचा मार्ग नाही, पण... चालावा लागतो!

- रोh@nj






Wednesday, March 25, 2020

मैत्री... (भाग २ - शेवट)


मस्त चाललंय लाईफ. सक्सेसफुल करियरच्या दिशेने माझं रोज एक पाऊल पुढेच पडतंय. टार्गेट इस ऑन द वे. सगळं काही बॅलन्स झालंय. माझं स्वप्न पूर्ण होणारय. माझं ध्येय लवकरचं मी गाठणारय. आणि हे सगळं शक्य झालं कारण सतत मला माझ्या ध्येयाकडे ढकलणारी शक्ती कायम कार्यरत होती. "ती." माझी गर्लफ्रेंड.
सॉरी गर्लफ्रेंड म्हटलेलं तिला आवडत नाही, होणारी बायको! माझं ध्येय पूर्ण झालं की आम्ही लग्नात बंधनार होतो. पण सध्या सगळं विस्कळीत झालंय. सगळं छान चालू होतं आधी. फॅमिली, करियर सोबत लव्ह लाईफ... एवरी थिंक वोस गुड. बट आता परिस्थिती अगदी उलट झालीय. का? कशी? काही कळत नाहीय. आज मी ध्येयाच्या वाटेवरून भटकलोय. आणि याला जबाबदार 'ती' चं. जिने घडवलं तिनेच बिघडवलं.

रडत खडत दोन वर्षे झाली आमच्या नात्याला. एकमेकांसाठी नवनवीन गोष्टी करणं, वेगवेगळ्या गोष्टींतून प्रेम व्यक्त करण, काळजी घेणं, सावरण, सगळं जबाबदारीने पार पाडण आणि सोबतच मजा-मस्ती लाईफ एन्जॉय करणं सगळं चांगलं चालू होतं.

मी खुश होतो ह्या सगळ्यात. एकीकडे मी माझ्या ध्येयाच्या दिशेने चालत होतो दुसरीकडे 'ती'चं प्रेम माझ्या पाठीशी होतं. मी मस्त जगत होतो. पण नात्याला कसलं ग्रहण लागलं कळत नाही. अचानक परीस्थित बदलली. वाद होऊ लागले. भांडण होऊ लागली. सुरुवातीला मी लाइटली घेतलं सगळं, वाटलं होतं भांडणाने प्रेम वाढतं. पण इथे मात्र फक्त भांडणच वाढतं होती. अगदी आता लग्नापर्यंत वाटचाल आल्यानंतर नातं मोडखळीला आलं होतं. ती खूपच विचित्र वागत होती. बारीकसारीक गोष्टींवर रागावणं, चिडन, दोन-दोन चार-चार दिवस संवाद टाळणं, ते आज अगदी माझ्यावर हात उचलण्यापर्यंत तिची मजल गेली. इतका द्वेष! का? कशासाठी? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला मला जबाबदार ठरवायचं, असली-नसली चूक दाखवून द्यायचं... चार-आठ दिवस रुसायचं आणि नको असलेला टोकाचा निर्णय घ्यायचा. काय मिळत 'ती'ला हे सगळं करून? आणि का करते 'ती' हे सगळं?

तिची माझी ओळख बालपणीची. एकमेकांकडे बघणं. बघितलं की नजर चोरून घेणं. वहीच्या शेवटच्या पानावर तीच नाव रेखाटन सगळं किती गमतीशीर होत ते. आमचं नकळत ट्युनिंग इतकं जमलं होत की आम्हाला न उमगलेली गोष्ट आमच्या मित्र मैत्रिणींना कळू लागली. मग काय, कधी शाळेच्या बाकावर... तर कधी भिंतीवर माझं आणि तिचं नाव एकत्र दिसू लागलं. पण आमच्यात अजून काही उघड बोलणं झालं नव्हतं. वय वाढत होत तस एकमेकांना आवडू लागलो होतो हे खरं. आणि आता मी तिच्या शेजारीच बसू लागलो. कधी वही-पुस्तक काढताना किंवा देता घेताना स्पर्श होऊ लागला. आहहह! ते दिवस आठवले की आजही अंगावर शहारा येतो आणि सगळं अंग कुरवाळून निघत. तिच्या होणाऱ्या स्पर्शाने मला 'स्त्री'चा स्पर्श, त्याची जाणीव पहिल्यांदा झाली. पहिल्यांदा झालेला तो स्पर्श, सुटलेलं पाणी, अंतर्मनासोबत अंतर्भागात झालेल्या गुदगुल्या डोळे मिटले की आताही 'ती'चा तो स्पर्श मला अनुभवता येतो. अल्लड वयातील माझं हे प्रेम.

शाळा संपली सगळे आपापल्या वाटेला गेले. आणि योगायोगाने 'ती' माझ्याच कॉलेजला आली. कॉलेजच्या टॉप स्टुडन्ट मध्ये तीच नाव होतं. कमालीची गोष्ट म्हणजे तिच्या हुशारीने आणि सुंदरतेने सर्वच मुलं तिच्याकडे आकर्षित होत. मला तर आता खात्रीच झाली होती मी प्रेमात पडलो. शाळेत जे काही झालं ते आता पुन्हा नको म्हणून धडपड करणं गरजेचं होतच. त्यात आता तिला मिळवणं म्हणजे कॉम्पिटिशन पण वाढलेलं. पण आपला झेंडा अटकेपार होणार याची खात्री होतीच. कधी बोलणं कधी भेटणं तर कधी दुरूनच तिला पाहता पाहता पुरत बुडून जाण आता रोजचंच झालं होतं. मी अक्षरशः वेडा झालो होतो 'ती'च्यासाठी. आता मला कुणी विचारलं तुझी gf आहे का तर  थेट मी तिच्याकडे बोट दाखवू लागलो. अख्या कॉलेजमध्ये आमच्या नावाची ही चर्चा आता कानावर येतच होती. प्रेमाची हवाच तशी असते कधी कशी कुठून कुठपर्यंत पसरते आपल्यालाच कळत नाही. पाहता पाहता दोन वर्षे निघून गेली आणि मी 'ती'चा होऊन गेलो.

आता 'ती'ला माझं करण्यासाठी सम्पर्क वाढवायचा होता आणि त्याकाळी सर्वोत्तम पर्याय म्हणजे फेसबुक. मीच रिक्वेस्ट पाठवली. दोन दिवस वाट पाहिली खूप उदास वाटत होतं आणि शेवटी नोटी फिकेशन आलं. 'ती'ने माझी मैत्री स्वीकारली. इतका खुश झालो होतो मित्रांना सहजच वडापावची पार्टी देऊन टाकली. आता हाय हॅलो सुरू झालं आणि आमच्यात गप्पा होऊ लागल्या. गप्पा वाढल्या जवळीक वाटू लागली आणि आता आमची पहिली भेट ठरली. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहिली ती 'ती'च्याशी झालेली पहिली भेट.

आता 'ती'ला सुद्धा माझा सहवास आवडू लागला. बोलण्यासाठी आता फेसबुकची गरज नव्हती. फोन वर छान गप्पा रंगू लागल्या. आता अगदी रोजच्या रोज बोलणं होऊ लागलं. सकाळी उठल्यावर, वाटेत चालताना की मग रात्री निजताना मलाही 'ती'ची सवयीचं लागली होती. जर कधी फोन वर बोलणं नाही झालं अगदी चुकल्या चुकल्या सारख वाटायचं. मी पूर्णपणे 'ती'च्यात गुंतलो होतो. कधी कामात तिने फोन नाही केला तर मात्र मी फोन करून msg करून तिला धारेवर धरायचो. खरंतर तिने कधी इग्नोर केलं तर मला कसंस व्हायचं. फोनवर चार शब्द का होईनात बोललं की बरं वाटायचं.

'ती'ला घेऊन पहिल्यांदा फिरायला गेलो. बागेत.निवांत, समोर समुद्र किनारा आणि बागेत छान वार सुटलेलं आणि झाडाच्या सावलीत आम्ही दोन पक्षी. गप्पा मारल्या मनमोकळे पणाने भावनांची देवाण घेणाव झाली. त्यानंतर अधून-मधून गाठी-भेटी आणि बागेतील गप्पा कधी वेळ मिळेल तस होऊ लागल्या. कधी मी वेळ काढायचो तर कधी 'ती'ला काढायला लावायचो. हळूहळू मला आता वाटू लागलं होतं की 'ती'माझ्या प्रेमात पडेल.

आणि कदाचित ते म्हणतात ना "किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है". 'ती' आता माझ्याच ऑफिसमध्ये जॉब साठी लागली. मला तर अस वाटू लागलं की एक झालं की एक सतत सुख माझ्या वाटेत वाढून ठेवलेलं आहे. भेटणं बोलणं हे आता अगदी रोजच झालं. आता ऑफिसमध्ये असल्याने भावनांना मी आवरच घातला होता. आणि 'ती'ही तशी कामात मग्न असायची मात्र काम झाल की पहिलं मलाच भेटायची. घरून निघाल्या पासून पुन्हा घरी जाई पर्यंत एकमेकांची काळजी करणं, जेवल्या झाल्याची जबाबदारीने विचारपुस करणं 'ती'ला उत्तम जमायचं. एकदम छान वाटायचं सार.

माझ्या मित्र मैत्रीणीना वाटायचं मी टाईमपास करतोय. पण मी कुठे असं काय केलं. जस ती माझ्याशी वागत होती तसंच मी हि वागत होतो. मग जगाला वाटायचं ते वाटू दे. मी त्याची पर्वा करणं सोडून दिल. आणि एक दिवस "ती"ने मला लग्नाची मागणी घातली.

इतका बालपणीपासूनचा प्रवास इतकं प्रेम एकत्र सहवास मग इतका वाद का ?
हेच होत आमच्यातील वादाचं मूळ. कारण

माझं अल्लड वयातील प्रेम म्हणजे, प्राजक्ता!
कॉलेजला भेटलेली ती प्रणाली...
फेसबुक वरील क्रश म्हणजे विशाखा...
फोनवरील विरंगुळा केला ती आदिती...
जीच्यासोबत फिरलो ती ललिता...
टाईमपास केला ती दीपा...
आणि लग्नाला मागणी घातली ती प्रिया!

आणि ह्यातील एकही गोष्ट मी तिला स्वतःहून सांगितली नाही. आणि परिणाम जेव्हा कॉलेजच माझं एकतर्फी प्रेम तिच्या समोर आलं तिथे आमच्या नात्याला ग्रहण लागलं. या सात गोष्टींशिवाय मी तिला एक गोष्ट सांगितली होती. माझं अफेर. अंजना. ती माझं पहिलं प्रेम असं मी तिला सांगितलं होत. आमचं ३ वर्षांचं नातं होत.

ती माझ्याच इथे राहायची. सतत बघायची मागे पुढे घिरट्या घालायची. आमच्यात जवळीक वाढली मैत्री घट्ट झाली. मी 'ती'ला माझ्या स्वप्नांबद्दल सांगितलं. तीच ही ध्येय जवळपास सारखंच होतं. त्या निमित्ताने आता मी तिच्या घरी जाऊ लागलो. हळूहळू ध्येय काय हे मी विसरून गेलो आणि तिच्यात गुंतू लागलो. ती फोकस करत होती ध्येयावर आणि मी तिच्यावर. भेटी वाढल्या एकांत आणि मनातला मोह सार एकवटल आणि एक दिवस माझे डोळे उघडले आणि ती माझ्या मिठीत होती. निर्वस्त्र! दोघेही तो क्षण मनापासून जगलो. माझ्या आयुष्यातील तो क्षण डोळ्यासमोरून आजही तसाच आहे. भिनलेल अंग शहारलेली ती. एकमेकांना ते कवटाळून धरलेलं पिळून टाकलेल शरीर. भानावर नसलेला मी नशेत असणारी ती. श्वासाची ती उब, घामाचा तो गंध, बसणारे ते हळू जलद दणके.... आणि सर्व थांबलं आणि दोघे भानावर आलो तेव्हा नजरानजर झाली. 'ती' मिठीत होती. आय लव्ह यु म्हणत तिला गच्च कवटाळून धरलं.

इतकं प्रेम होतं आमच्यात. 3 वर्ष हे छान अस प्रेम! आठवड्यातून किमान 3 दिवस तर ठरलेलेच होते एकेमकांसाठी आणि एकमेकांच्या मिठीत. मग वेळ नाही की जागा नाही की कुणाची अडचण नाही. बस वाहून घ्यायचं एकमेकांच्या शरिरात. मी सुखावत होतो. वेडा झालो होतो. आणि ती सुद्धा गुंतली होती माझ्यात, माझ्या शरीरात.
अस प्रेम कुणीच कुणावर केलं नसेल इतकं प्रेम होतं ह्या नात्यात.
आणि माझ्या घरचांना याचा थांगपत्ता हि नव्हता. मैत्रीण म्हणून ठाऊक होती. आणि त्यामुळे दिवस भर तिच्या घरी असलं तरी कामाच्या निम्मिताने असल्याने घरच्यांनी कधी कधी यात एक शब्द काढला नाही कि मला अडवलं नाही.

मी माझ्या या अफेर मध्ये काय झालं कस झालं फारसं सांगितलं नाही पण या ३ वर्षांच्या अफेर बद्दल मी तिला म्हणजे होणाऱ्या बायकोला साधम्य कल्पना दिली होती. यावरून व्हायचे कधी तरी वाद पण ते निवळायचे सुद्धा.
पण जेव्हा कॉलेजची आणि सात मधील एक गोष्ट तिच्या समोर आली तिथे आमच्या नात्याला वणवा लागला तो आज नातं तोडूनच थांबला.

नात्याच्या सुरुवातीला अगदी आठवड्याच्या आतच तिने सगळं माझ्यापुढे मांडलं आणि तिच्या मनावरचं ओझं रिकामं केलं. मुळात तिने जे संगितल किंवा तिच्या आयुष्यात जे घडलं ते तितकंसं महत्वाचं किंवा सांगण्यासारखं त्यात नव्हतं तरीही तिने जबाबदारी आणि नात्याचा पाया भक्कम असण्यासाठी सर्व काही माझ्यापुढे ठेवलं...

मी मात्र माझ्या आयुष्यातील एक घटना माझं एक अफेर फक्त तिला सांगितलं.

आणि हे सारं काही तिने मनावर दगड ठेऊन स्वीकारलं सुद्धा. ही गोष्ट मी तिला सांगितलं तेव्हा ते माझं पहिलं प्रेम पहिलं अफेर असंच सांगितलं आणि तिने विश्वास सुद्धा ठेवला. अनेक वेळा तिने मला विचारलं जे काही मनात असेल किंवा सांगायचं असेल ते सांगून टाक. 'मी सत्य पचवेन, खोटं नाही'. लपवू नकोस माझ्यापासून कधीच काही. मी तिला मोठ्या विश्वासात घेऊन सांगितलं 'सांगण्यासारखं काहीच नाही. एक अफेर होत ते तुला सांगितलं'.
आता ती निश्चित झाली.

आणि एक दिवस तिच्या समोर एक नाव आलं. प्रणालीच आणि तुझं नात काय?

मी थबकलो प्रणाली तिचीच मैत्रीण होती. तेच माझं कॉलेजमधील प्रकरण निघालं. मी शांत पणे उत्तरलो नॉर्मल ओळख फक्त होती आणि वर्ग मैत्रीण म्हणता येईल. तुझं प्रेम होतं तिच्यावर? मी हसलो आणि म्हणालो काही काय तस काही नव्हतं. तिचा विश्वास बसावा म्हणून "मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिची खोटी शपथ घेऊन तिला विश्वासाने म्हटलं माझं तीच काही नव्हतं."

ती प्रचंड रागात होती तिने राग पोटात घातला आणि शांत झाली. मला वाटलं ती विसरून जाईल. पण एक दिवस ती पुराव्यांसहित माझ्याकडे आली. पुन्हा मला तोच प्रश्न केला. मी पुन्हा तेच उत्तर दिले. तिच्या रागाचा पारा चढला आणि तिने खाडकन पेटवली. आणि सगळे पुरावे पुढ्यात मांडले.

माझ्या पायाखालची जमीन सरकली तिचा राग अनावर होत होता. मला कळेना काय करावं. मी रडलो, हाता पाया पडलो पण तिच्यासमोर आता माझ्या प्रेमाची किंमत शून्य झाली होती. तिच्या डोळ्यांत आक्रोश होता. ती फक्त एकच वारंवार बोलत होती. "तू माझ्याशी खोटं का बोललास, का लपवलस सगळं". आणि मी तिला विनवण्या करून एकच सांगत होतो, "माझ्या मनात चुकीचं काही नव्हतं, तुला गमावण्याच्या भीतीने खोटं बोललो".

तिचा पारा आणखी वर चढला, मला गमावण्याच्या भीतीने तू माझ्या डोक्यावर हात ठेवून खोटं बोललास. खोटं बोलून नात निभावणार होतास.. तर हे नातंच मला नको.

तिने थेट नातं तोडण्याचा निर्णय घेतला.
तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम असताना तिने हा निर्णय घेतला.
मी म्हणालो, तुला माझं प्रेम नाही का दिसत,
ती म्हणाली प्रेम असेल ही खंर पण तू खोटा निघालास.

वाद विकोपाला गेला होता. मी गुडघे टेकले आणि शेवटी ती नरमली. तिने माफ केल. मला मिठीत घेतलं. आणि मला पुन्हा विचारलं जे काही असेल मनात आणि तुझ्या आयुष्यात ते बोलून मोकळा हो. मी काही नाही म्हणत तिला बिलगून राहिलो. ती ही शांत झाली.

माझ्यात मन ही मन आता एक दडपण निर्माण झालं होतं. तिच्या रागाचं. तिच्या वागण्याचं. ती रागात मला काहीही बोलत होती. हात उगारत होती. ती मला समजून घेईल का आणि माझा सारा भूतकाळ स्वीकारेल का. याची मला शंका वाटू लागली. आणि मी सर्व काही मनात ठेवलं. शिवाय माझी स्पष्ट भूमिका होती... जे होत रिलेशन ते सांगितलं होतं बाकी सात जणी तर माझ्या ***"मैत्रिणी"*** होत्या!

दोघांच्याही मनात कुठेतरी ही गोष्ट आता गाठ बनून बसली होती. त्यामुळे ती बारीक सारीक गोष्टींचा फार विचार करू लागली. तर दुसरीकडे मी चुकांवर चुका करू लागलो.
एखादी गोष्ट ठरवली की या ना त्या कारणाने माझ्याकडून ती गोष्ट मोडीत निघायची. पुन्हा तिचा राग, द्वेष अन रुसवा.
भांडायची रागवायची अन ब्लॉक करायची. पण मी माझे प्रयत्न "मेसेज आणि फोन करून" सतत चालू ठेवायचो.

पण इथेही तिला ते मान्य नसायचं मेसेज फोन पेक्षा तिच्या समोर येऊन भेटून काय ते बोलावं अशी तिची अपेक्षा. मी काही कधी इतका भाव दिला नाही. कारण इथपर्यंत आल्यावर मलाही कळलं होतं "तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे", आणि ती माझ्या शिवाय राहू शकत नाही. हे मी चांगलं जाणून होतो त्यामुळे मी हाजी हाजी करणं जरा कमीच केलं.

शिवाय तिच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितलं होतं, तिचा राग म्हणजे नुसती हवा. "रागात काहीही बोलू दे, काही ही करत नाही. बोलाची कढी नि बोलाचा भात". आता तिच्या जुन्या जाणत्या मैत्रिणीकडून हे ऐकल्यानंतर माझ्या मनातील निम्मी भीती कमी झालीच. मी काही केलं तरी नात तुटणार नाही, ती बोलते सोडून जाईन पण ती मला सोडून जाणार नाही याची मला शाश्वती मिळाली. कारण तीच प्रेम होतं तितकं, तिच्यासाठी मी जीव की प्राण होतो आणि हे मी चांगला जाणून होतो. शिवाय माझं हि तिच्यावर मनापासून जीवापाड प्रेम आहे हे तीहि जाणते.

कदाचित यामुळेच मी वारंवार चुकत होतो मग ते काही करण्याच्या बाबतीत, ठरवण्याच्या बाबतीत किंवा नात्याला घट्ट करण्याच्या बाबतीत.

दुसरीकडे ती कितीही रागावली तरी राग शांत झाला की पुन्हा माझ्याकडे संपूर्ण जबाबदारीने पाहायची. मला काय हवं नको सार पाहायची. ती माझी आई बाप भाऊ बहीण मैत्रिण अश्या सर्व बाजूने जबाबदारी सांभाळायची. जिथे आईच्या मायेची गरज भासली तिथे ती पदर खोचून उभी राहिली. कधी मी थकलो तेव्हा बापासारखी पाठीशी राहिली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या ध्येयासाठी अहोरात्र झटायची. तिने माझं स्वप्न तीच मानलं होत आणि फक्त मानलं नाही तर त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट तिने मला दिली. ते वातावरण निर्माण केलं आणि त्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे सारं माझ्याकडून करून घेऊ लागली. आणि कदाचित याचंच मला ओझं वाटू लागलं. आणि मी या सगळ्या गोष्टी तितक्या मनापासून केल्या नाहीत जितकं तिला अपेक्षा होती. कदाचित ती ओव्हर करत होती अस मला वाटायच. म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत सगळ्या गोष्टी ज्या त्या वेळेत तशाच रोज झाल्या पाहिजेत. हे म्हणजे जबरदस्ती वाटू लागली होती मला. पुन्हा सगळा दिवस संपला की तिला रिपोर्टिंग करायचं. हा काय बालिशपणा? मला हे फार काही पटत नव्हतं पण माझ्या परीने मी सगळं करत होतो. आणि मनापासून करत होतो. शिवाय तिला अपडेट सुद्धा देत होतो. मग त्यातही हे असंच का आणि तसंच का?
असे १०० प्रश्न विचारून नको त्या प्रकारे विषय भरकटत जायचा. पुन्हा वाद विवाद कुठे सुरू कुठे संपायचे.

शिवाय ध्येगाच्या तयारी सोबत तीच माझ्या इतर गोष्टींत सुद्धा लक्ष देण वाढलं... माझं शरीर, आरोग्य याकडे लक्ष द्यायला मी काही लहान नव्हतो. पण ती त्याकडे सुद्धा शरीर लटकत आहे, व्यायाम कर योगा कर, वजन इतकंच ठेव अशा गोष्टी करू लागली. सुरवातीला मी ही केलं अगदी मनापासून. पण रोजच्या रोज सगळं होतच अस नाही ना! मग यावरून सुद्धा वाद. माझी माझ्या शरीराची काळजी करायला मी काय लहान होतो का. पण तिच्या मते ह्या सगळ्या गोष्टी समाजात राहण्याच्या, निरोगी राहण्याच्या शिवाय पर्सनॅलिटीच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या.

पण या साऱ्यात तिने माझ्या सोबत माझ्या घरच्या जबाबदाऱ्या ही पार पाडल्या.
इतकं सगळं ती माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी माझ्या ध्येयासाठी करायची हे सगळं माझ्या घरच्यांना दिसत होतं पण तरीही त्यांच्या मनात तिच्यासाठी जागा नव्हती. का कुणास ठाऊक पण घरच्यांमध्ये आणि तिच्यामध्ये नेहमी एक वेगळा तणाव मला जाणवायचा. ती अनेक वेळा माझ्या सोबत माझ्या घरच्यांचा विचार करायची. त्यांच्या हेल्थ बद्दल काय करावं, भविष्य सुरक्षित असायला काय करावं, ती माझ्या आई बापाला आपलेच आईवडील मानून चालत होती. आणि त्या प्रमाणे वागत ही होती. प्रत्येक सणावाराला येऊन तो परिवारासोबत साजरा करण, सोबत वेळ घालवणं यायला जमलं नाही तर फोन वर आई वडिलांची विचारपुस करणं. हे सगळं करून ती त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ते कधी झालं नाही असा तिचा समज.

नेहमी माझ्या समोर बोलायची तुझे आई वडील पुढ्यात एक मागे एक अस वागतात. त्यांनी मनापासून मला स्वीकारलेलं नाही. त्यांच्या मनात माझ्या विषयी द्वेष आणि तिरस्कार आहे. मी विषय टाळायचो. लक्ष देऊ नकोस. ते काळजीने बडबड करतात. त्यांच्या मनात वाईट असं काहीच नाही. असं बोलून मी वर्ष घालवलं. पण आई बाबांच्या मनात काय हे मलाही चांगलं माहित होतं.

तिच्या मते त्यांच्या मनात जर माझी जागा असती, त्यांनी मला आपलं मानलं असत, सून मुलगी मानलं असत तर त्यांनी आपल्या घरात मला जागा दिली असती. "जिथे मला किचन मध्ये हातभार लावण्यास मनाई आहे तिथे त्यांच्या मनात अजून किंतु परुंतु असल्याचं स्पष्ट होत". ती बोलत होती ते बरोबर होत कारण ज्या घरी परक्या मुलीला स्वयंपाक घरात जागा दिली जाते ती परकी नसून त्या घरची हक्काची मुलगी असते. आणि ती जागा तर माझ्या घरी तिला दिली जात नव्हती हे मला ही दिसत होतं. आई बाबा सुद्धा ती येण्या आधी किंवा घरातून बाहेर गेल्यावर तिचा आणि सोबत माझा ही उद्धार करायचे. मात्र मला कधीही त्यांची बाजू चुकीची वाटली नाही. का वाटेल शेवटी लहानाच मोठं केलंय त्यांनी. मी आज इतकं चांगलं आयुष्य जगत आलोय, जगतोय ते त्यांच्यामुळेच. ज्यांनी घडवलं त्यांना कस चुकीचं ठरवू ते ही काल परवा आलेल्या मुलीसाठी. माझ्या परिवारात आणि त्यांच्यात इतकी तेढ निर्माण झाली की एक दिवस ती दोघांपैकी एक अस निवड ठेऊन निघून गेली. मी येतो म्हणालो तिला पण तिलाच परत बोलावण्याचा माझा डाव फसला. कारण मी माझ्या घडवणाऱ्यांची साथ कधीच सोडू शकत नाही.

पुन्हा वाद, ब्लॉक आठवड्याचा अबोला.
जे नको होतं तेच बायको म्हणता म्हणता गर्लफ्रेंड सारख ब्रेकअप पॅचअप चालू झालेलं मला जाणवू लागल होतं.

अस असताना तिच्या घरी मात्र तिने सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती. तिच्या घरी मला मान सन्मान तर होताच शिवाय माझी नव्हती तितकी उंची तिने त्यांच्या नजरेत भरली होती. तिचे घरचे नातेवाईक ते अगदी मित्र मैत्रिणी इथंपर्यन्त सगळ्यांपुढे ती माझ्या कौतुकाची स्तुतीसुमने वाहून थकत नसे. तिचे मित्र मैत्रिण तर एक आदर्श कपल म्हणून आमच्याकडे बघत. शिवाय माझ्या बद्दल प्रत्येकाच्या मनात तिने एक विशेष स्थान निर्माण केलं होत. तिच्या घरी मी कधीही आलो गेलो सदैव त्यांच्या निर्मळ मनात मला आपुलकीच मिळाली. मी तिच्यासाठी काहीच केलं नव्हतं पण तिने त्यांना अनेक अश्या गोष्टी सांगितल्या आणि त्या मी केल्याचं त्यांना सांगितलं आणि कधी एखादा वाद असेल किंवा माझा भूतकाळ याबद्दल तिने चकोर कुणाला कळू दिल नाही. तीच वागणं बोलणं सगळं तिच्या तत्वांवर होतं.

पण इतकं प्रेम मिळून तिच्या घरच्यांसाठी मी काही विशेष केलं नाही. उलट तिनेच स्पष्ट सांगितलं पत्रिका जुळत नाही

ती तुम्ही पाहून घ्या. मी लग्न करणार तर त्याच्याशीच. "एकवेळ जेव्हा घरात मोठ्या बहिणीच्या लग्नावरून विषय निघाला तेव्हा सरळ हिने तुम्ही लावून दिल नाही तर कोर्टात जाऊन लग्न करेन अस सांगितलं".

मी ही घरी सांगितलं होतं, लग्न करेन तर तिच्याशीच. पण जेव्हा काही क्षणांसाठी घरच्यांना सोडून तिच्या जवळ जाण्याची वेळ आली तेव्हा मी अनेकदा तिला एकट सोडलं होत.

एक दिवस दोघांत मोठा वाद जुंपला. विषय माझं ध्येय माझं स्वप्न. मी असाच करतो मी तसाच करतो... सर्व काही... आजपर्यंतच्या सर्व चुकांच खापर ती माझ्यावर फोडू लागली. प्रत्येक वेळी मीच का ऐकून घ्यायचं, मीच का वाकायचं. माझा ही पारा चढला. शेवटी रागाच्या भरात मीही बोललो तुला आजपर्यंतच सगळ्या चुका दिसल्या, प्रेम  नाही दिसलं का?

प्रत्येक वेळी बोलून दाखवतेस तू माझ्यासाठी काय काय केलंस ते...
मला नाही जमत तुझ्यासारखं केलेलं बोलून दाखवायला...
तिचा पारा आणखी चढला आणि म्हणाली सांग, दाखव मोजून.. काय काय केलंस ते, बोल...
का तुला चुका सोडून काहीच दिसत नाही,
*नाही लावला का जीव
नाही केलं तुझ्यावर प्रेम
नाही घेतलं तुला मिठीत सांग...*
मी केलेल्या गोष्टींची यादी तुझ्या इतकी मोठी नसेल पण माझं प्रेम खर आहे आणि मनापासून आहे.

असाच अनेक वाद विवादासह नात तुटण्याच्या मार्गावर येऊन कधी मी कधी तिने सांभाळल. बहुदा मीच सांभाळलं कारण ती तर रागात नात तोडून निघून जायची. आठ आठ दिवस ब्लॉक, बोलणं नाही, भेटणं नाही. "मी शेवटी पुढाकार घेऊन थेट भेटून तिची समजूत काढून पुन्हा नवीन सुरवात करू" अस म्हणत पुन्हा नात्याचा गाढा ओढायचो.

तेवढ्यात एक दिवस पुन्हा वाद भडकला. यावेळी मी थेट आक्रमक पवित्रा घेतला.
सगळं घडत ते माझ्यामुळेच घडत..
तू कधी चुकत नाहीस ना..
आजपर्यंत जेवढे वाद झाले सगळे माझ्यामुळेच झाले..
तुझं सगळं बरोबर आहे,
तू कुठे काय करतेस.
माझी अशी भाषा ऐकून ती चेतावली
शिवी गाळ करू लागली, नको नको ते मनाला येईल ते बोलू लागली आणि माझ्यावर नको ते आरोप करू लागली.
आणि मी ही म्हणालो तुझ्या ह्या अशा वागण्यामुळेच माझं कामात लक्ष लागतं नाही. कस ध्येय गाठणार?
तुझ्यामुळेचं अडथळा निर्माण होतोय स्वप्न पूर्ण होण्यात.

ती निशब्द झाली.
माझ्यामुळे स्वप्नं पूर्ण होत नाही..
मी अडथळा आहे ध्येयाच्या मधला..
माझ्यामुळे स्वप्नं पूर्ण होत नाही..
मी अडथळा आहे ध्येयाच्या मधला..
असंच बडबड करत हीच वाक्य बरळत ती निघून गेली.


मी ही नाही अडवलं.
काय चुकीचं बोलो होतो का?
सारखं तेच तेच...
किती छोट्या गोष्टी आहेत ह्या. याकडे दुर्लक्ष करायला हवं तिने, पण नाही तेच मनात धरून बसायचं आणि स्वस्ताच्या मनाचं करायचं.
जाऊदे तिला नातंच नको आहे म्हणून ती अस वागते.
नाहीतर अस केलंच नसत. तिच्या मनासारखं झालं आता. गेली सोडून जाऊदे मी माझ्या जागी बरोबर आहे.
त्यातही मी प्रत्येक वेळी माफी मागितली आहे.
चूक असो किंवा नसो मी प्रत्येक वेळी माफी मागितली.
आणि माफी मागून पुरे नाही. झालेली चूक लिहून काढायची, मग ती सुधारण्यासाठी मी काय करणार हे सुद्धा तिला लिहून द्यायचं. काय फालतूगिरी आहे ही. हे काय अर्थहीन. चूक लिहून काढा मग ती सुधारणार कशी लिहून काढा. मला तर यामागचं लॉजिकच कधी कळलं नाही. तरीही मी दिलंय तिला अनेक वेळा अस लिहून.
अनेक वेळा लिहावं लागलं?
याचा अर्थ मी अनेक वेळा चुकलो होतो का?
छे... ते तिच्या समाधानासाठी होतं.
तिने दे म्हटलं मी दिलं. बस.

या अशा परिस्थिती काही महिने सरकले आणि एक एक करत माझ्या भूतकाळातील सात गोष्टी तिच्या समोर आल्या. प्रत्येक वेळी ती रागावली, भांडली, माझ्यावर हात देखील उचलला. मी मात्र प्रत्येक वेळी रडून रडून हेच सांगितलं मी जे केलं तो माझा भूतकाळ होता.
त्यावर ती म्हणाली हा भूतकाळ होता मग सांगितलं का नाही जेव्हा मी विचारत होती, का नाही सांगितलं जेव्हा एक अफेर होत सांगितलं होतंस, तुझं ३ वर्षांचं घाणेरडं नातं मी स्वीकारलं होत तस ही लफडी सुद्धा पोटात घातली असती, मग का लपवलीस.
त्यावर मी अनावर झालो. तोंड सांभाळून बोल मी रस्त्यावर पडलेला नाही जे वाटेल ते बोलशील.
शब्दाला शब्द भिडू लागला. तू खोटा आहेस, तू फसवलं मला. सगळं लपवून ठेवलंस माझ्यापासून. असे नको नको ते आरोप तिने माझ्यावर केले. आणि मी थेट बोललो मी तुला फसवलेलं नाही, जे होत ते तुला सांगितलं आणि जे तुला समजलं त्यात सांगण्यासारखं काहीही नव्हतं.

काही नव्हतं?
तुझ्या ह्या ७ लफडयात सांगण्यासारखं काहीही नव्हतं?

लफडी म्हणू नकोस, झोपलो नव्हतो सगळ्या मुलींसोबत.

अच्छा म्हणजे झोपलास म्हणजेच वाईट केलंस, लफडं केलंस, मगच सांगणार होतास.
जे केलंस त्यात सांगण्यासारखं काही नव्हतं, तोंड उचलून हे बोलायला काही वाटत नाही तुला?

मी काही चुकीचं केलंच नाही तर का वाटेल चुकीचं.
त्या सगळ्या माझ्या **मैत्रिणी** होत्या. आमच्यात नुसती मैत्री होती.

अरे काय बोलतोयस कळतय का तुला तू या अश्या संबंधांना मैत्री बोलतोस. लाज वाटते का तुला.

मला माहितीय माझं आणि त्यांचं काय होतं आणि काय नाही. तुला समजायचं ते समज आता.

वाह एवढं सगळं करून शेण खाऊन सगळ्याला मैत्रीचं नाव देऊन मोकळा झालास.

तुला ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतायत की आपलं नात आणि एकमेकांवर असलेलं प्रेम?
मी प्रेमात आणि तुझ्या मागे कधीही काही चुकीचं केलं नाही.

तू आता गप्प रहा ह्या ७ मधल्या ४ मुली तर आपण नात्यात आल्या नंतर सुद्धा तुझ्या संपर्कात होत्या. आणि त्यांना तू झालेली गोष्ट बोलतोयस.

अरे किती वेळा सांगू त्या माझ्या फक्त आणि फक्त मैत्रिणी होत्या. त्यांच्यात आणि माझ्यात तस काही नव्हतं जे तुला वाटतंय.

ते अल्लड प्रेम, कॉलेजचा जगभर पसारा, दिवसभर फोन, फिरणं, लग्नाची मागणी या सगळ्याला तू मैत्री म्हणतोस?

हो आमच्यात फक्त मैत्री होती.
आणि होत्या काही जणी संपर्कात पण आता कोणीही नाही. तू सोडून माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी नाही.

तुझी मैत्री होती यावर तू ठाम आहेसच ना ठिकय. यापुढे तुझा माझा संबध संपला.

ऐक उगाच टोकाचा निर्णय घेऊ नकोस.

उगाच..
यापुढे
मी तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीही येणारं नाही.

माझ्या मुळे तुझ्या ध्येयात स्वप्नात अडथळा येणार नाही.
तुला माझा राग, बोलन यापुढे सहन कराव लागणार नाही.

आता हेच धरून बसणार यस का...
तुला नातंच नको होतं म्हणून अशी बोलतेस.

हम, बरोबर बोलास मलाच नातं नको होतं
माझं प्रेम नव्हतं, म्हणून आज तुला सोडून चालली
आणि हे नातं माझ्यामुळेच तुटलं माझ्या रागाने आणि माझ्या स्वभावाने.
चूक केली मी माझ्या आई बापांशी वाद घालून, त्यांना अडचणीत आणलं होतं. जो एक पाऊल घरच्यांशीवाय टाकू शकत नाही त्यासाठी घर सोडायला निघाली होती.
आणि ते ही तुझ्यासारख्या मुलासाठी.
आता नाही.
पुन्हा मी येणार नाही तुझ्या वाटेत.

ती निघून चालली.

हा. जा जा.
जिथे जायचं तिथे जा.
नाही अडवणार तुला आता.
झालं ना तुझ्या मनासारखं.
जगेन माझा मी, खूप केलंस ना माझ्यासाठी
माझ्या माणसांसाठी आणि माझ्या स्वप्नासाठी. ठिकय. जा
आता तुला तुझा मार्ग मोकळा आहे.
जगेन माझा मी
तू केलेलं कष्ट वाया जाऊ देणार नाही
एक ना एक दिवस माझ स्वप्न पूर्ण करेन.
आता फक्त ध्येयासाठी जगणार आणि ज्यांनी मला घडवलं त्यांच्यासाठी जगणार.
माझा मार्ग आता मीच निवडणार.
जा तू तुझ्या मार्गाने,
आता तू ही माझी एक मैत्रिणच होतीस म्हणेन.
आठवी मैत्रीण!

(मला माहितीय ती आता परत कधीच येणार नाही. शेवटी तिने तिच्या रागानेच संपवलं सगळं. मी आता ठाम राहणारजाताना तिच्या बॅगेतून एक वही पडली, त्यात आमच्या सर्व आठवणी जपल्या होत्या. सर्व चांगल्या वाईट बरच काही होत त्यात. आणि सोबत एक पत्रक होतं. सेम तसच जे तिने मला पहिल्या वेलेन्टाईलन डे ला गिफ्ट केलं होतं. फक्त ते रिकाम होत, काही लिहिलं नव्हतं. आणि तिने मला त्याचा अर्थ ओळखायला सांगितलं होतं जे मला आजवर नाही समजलं आणि मी फारस लक्ष ही दिल नव्हतं.
पण यात असच एक पत्रक आणि पत्रकावर कविता होती. तिने लिहलेली....)

तू प्रेम केलंस?

मान्य य मला तू प्रेम केलंस
अगदी मनापासून केलंस
जीव लावलास
मिठीत घेतलंस सगळं केलंस
तू प्रेम केलंस?

२ वर्षांत प्रेमाची दुमजली
इमारत उभारलीस
तळमजला, पहिला मग दुसरा
पण त्याखाली असलेला
पाया भक्कम केलास?
तू प्रेम केलंस?


खोट्याच्या विटा रचून
तू पाया भरलास
तळमजल्यावर येऊन
मित्र सह परिवारा समक्ष
मलाच नग्न केलास
तू प्रेम केलंस?

पहिल्या मजल्यावर येता येता
तूझ्या नजरेत एक स्वप्न पाहिलं
बघता बघता माझ्यातला मी मारून
माझ्यात स्वप्न उतरवलंस
केले प्रयत्न मी साम दाम दंड भेदाचे
ध्येयात तरी अडथळा मलाच ठरवलंस
तू प्रेम केलंस?

मला माहितीय तू प्रेम केलंस
तुझा लावलेला जीव,
मारलेली मिठी
अन् जीवापाड प्रेम मलाही दिसलं
मी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी ते
अनुभवलं
का कधी नाकारलं ?
तू प्रेम केलंस!

तू प्रेम केलंस
तुझ्या अनेक चांगल्या गोष्टी,
कला, भेटवस्तू मी मनात अन घरात
साठवलंय
प्रेम प्रसंगाच्या क्षणांनी तर अंग
अंग गहिवरलय
मी तुझं प्रेम आधी पासून
नात्याचा दुसऱ्या मजल्यावर पाहिलंय!

आजवर कुणीच नाही केलं
तू इतकं प्रेम केलंस
तुझ्या शिवाय नाही जगू वाटत
तू इतकं प्रेम केलंस
पण नात्याची दुमजली इमारत
उभारताना तू पाया
तळमजला अन पहिल्या मजल्यावर
लक्षच नाही दिलंस

मी एक एक गोष्ट जोडत होतो
आणि तू जीवापाड जीव लावत होतीस
फरक एवढाच मी नात्याला
रोपट्यासारखं वाढवत होतो
अन् तू वृक्ष नजरेत भरलं होतंस
तरीही माहितीय
तू खूप प्रेम केलंस !!!

- रोh@nj




Thursday, February 13, 2020

मैत्री... (भाग १ - सुरुवात)


धावताना शर्यतीत पाखरांच्या, पाखरू मज भेटले...
वेचताना मधाचे थेंब, जीवन तिने गोड केले...


तिच्यासाठी लिहिल तेवढं कमीच. 'ती' म्हणजे माझी बायको. म्हणजे झाली नसली तरी बायकोच! तिच्यासाठी लिहायला शब्द अपुरे पडतात. कधी कधी मलाच कळत नाही तिचं शब्दांनी कौतुक करावं की शिंपल्यातल्या मोत्यांनी तिला येऊन सांगावं... तू आहेस म्हणून आज मी आहे... "तुझ्यातून सुरुवात अन् तुझ्यात अंत आहे".

या एका ओळीत तिचं माझ्या आयुष्यातील स्थान दडलंय. तिची जागा ही आता कायमची तिचीच झालीय. म्हणून तर तिला लाडाने बाबू शोना नाही "बायको" म्हणतो. कारण गर्लफ्रेंड बदलता येते, बायको नाही. आणि ती वागते ही अगदी तशीच हक्काने आणि हट्टाने. एकदम 'एड' य ते माझ्यासाठी.

प्रेमाची सुरवात जर मैत्रीतून झाली तर ते नातं अनंत टिकत आणि आमचं ही तसंच. हा प्रवास सुरु झाला आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ना काही ठरवून ना काही विचारून नकळत हे नातं जुळलं होत. तिच्याबद्दल एक आवर्जून सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे तिचा 'प्रामाणिकपणा'. नात्यात बंधल्यानंतर अगदी सातव्याच दिवशी बागेत गप्पा मारताना तिने मनमोकळे पणाने तीच आयुष्य माझ्यापुढे मांडलं. तीच घर, परिवार, नाते-संबंध, 'मित्र'-मैत्रिणी सगळं; तिचा वर्तमान-भूत मांडून अगदी भविष्यात काय काय करायचं इथपर्यंत सगळं माझ्या पुढ्यात ठेवलं. आणि मलाच प्रश्न केला, आता तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहिती आहे. आता तू विचार कर आपण एकमेकांसाठी योग्य आहोत का?
तिचा हा 'भोळा-भाबडा' स्वभाव पाहून मी मनोमन इतका सुखावलो, वाटलं कॉलेजमध्ये असतानाच हिच्याशी बोललो असतो तर इतका उशीर झाला नसता. जस तिला कॉलेजमध्ये पाहिल्यावर माझी समजूत होती अगदी तशीच 'सोज्वळ' होती ती. तिच्या प्रश्नावर मी नुसतं हसलो. खरंतर माझ्या मनात प्रश्न पडला की 'मी हिच्या योग्य आहे की नाही'.

तिने सार आयुष्य पुढ्यात ठेवल्यानंतर आजतागायत तिच्या एकाही गोष्टीवरून मला तक्रार करण्याची संधी मिळाली नाही. मात्र मीच कपाळकरंटा. काही दिवस गेले आणि मी 'दारू' घेत असल्याच तिला समजलं. मी काही अगदी बेवडा नव्हतो, की रेग्युलर सुद्धा घेत नव्हतो... असच कधीतरी ओकेशनली घ्यायचो. अनेक बियर आणि दारू चे टॉप ब्रँड चाखून झाले होते एवढंच.
माझ्याकडून तिला भेटलेली ही 'पहिली जखम'. ती दोन दिवस अबोल राहिली. मी खूप विनवण्या केल्या. शेवटी मी आश्वासन दिलं, पुन्हा बाटलीला वळून बघणार नाही. त्यावर ती म्हणाली, "तू पितोस याच वाईट नाही वाटत, तू ही गोष्ट माझ्यापासून लपवलीस याचं वाईट वाटतयं. तुझ्या पिण्यावर मी कधीच रोख घालणार नाही, पण इतरांसोबत नको पिऊस. कधी कोण गैरफायदा घेईल कळणार नाही, तुला जेव्हा वाटेल माझ्या समोर घे, हवं तर मी सुद्धा घेईन... पण त्याच प्रमाण किती असावं, हे तू ठरव". तिचं प्रेम आणि समजूतदार पणा बघून पुन्हा ईच्छाच झाली नाही (तरीही घेतलीच होती मध्ये अनेकदा). म्हणून म्हणतो, तिच्या कौतुकासाठी शब्दांची नशाही फिकी पडेल.

आमच्या नात्याला सुरुवात झाली तस "तिने स्वतःला जणू संसारातच झोकून दिलं". अनेक बदल तिने स्वतःत केले. माझ्यासाठी तिने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. ज्या गोष्टी नात्यात आडव्या वाटल्या त्या सोडून दिल्या. ज्या गोष्टी बदलता येत नव्हत्या तिथे योग्य ती तडजोड केली.

ती माझी "दुसरी आईचं" वाटू लागली होती. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण आईसारखं ती सांभाळत होती. लहानपणी मला डोक्याला तेल लावलेलं आवडायचं नाही. मग आई शोधून, ओढून पकडून मला तेल लावायची. आणि आता ही. मी डोकं दुखतंय म्हटलं की ती लगेच आपल्या जवळ बसवणार आणि तेल मालिश. आता ती "चंपी" करते माझी. मलाही छान वाटत. मग कधी कधी डोकं दुखत नसतानाही दुखतंय म्हणून तिच्याकडून चंपी करून घेतो, पण आजपर्यंत तिने एकदाही कधी कंटाळा आलाय किंवा मी नाही करणार म्हटलेलं मला आठवत नाही. उलट आवडीने आणि लाडाने कुरवाळत मला एखाद्या बाळाप्रमाणेच ती मालिश करते. म्हणून तर तिच्या स्पर्शात आईची माया आठवल्याशिवाय राहत नाही.
आणि हे एवढंच कारण नाही की तिची तुलना आईशी (मुळात तुलना नाही ही) किंवा आई सारखी माया करते म्हणण्याचं. आईनंतर ती पहिलीच स्त्री जी "मला तिच्या हाताने भरवते". आणि फक्त भरवत नाही हा, तर जोपर्यंत 'पहिला घास मला भरवत नाही तोपर्यंत स्वतःच्या तोंडात अन्नाचा तुकडा घालत नाही'. मग ते हॉटेल असो की कुणाचं घर मॅडमना भीती नाही. पहिला घास माझाच. आणि मी मात्र तिच्या आधी २-४ घास खाऊन एखाद डेकर देऊन मोकळा होतो. त्यावेळी मात्र तिची ती मांजरा सारखी नजर आणि नटखट राग बघायला जाम भारी वाटतं. आणि मग मी भरवल्याशिवाय स्वतःचा पहिला घास देखील खाणार नाही. मी सोबत असतानाच तीचं हे नेहमीचं असं.
शिवाय सणावाराला किंवा विशेष दिवसाला "माझे आवडते पदार्थ बनवण्याचा विशेष बेत". म्हणजे मला कधी सांगण्याची किंवा मागण्याची गरज सुद्धा भासली नाही. माझ्या आवडीचे पदार्थ बनवून भरवन जणू तिचा छंदच बनला आहे. या बाबतीत मी मात्र तिला अजून पर्यंत काही बनवून दिलेलं नाही. एक मॅगीच येते बनवायला जे की तिला आवडत नाही. त्यामुळे माझ्या हातची चव तिला आता कधी चाखता येणार नाही.

हे सगळं करत असताना सर्वात महत्वाचं जे ती करत आली ते म्हणजे 'दिलेला शब्द पाळणे, आणि ठरलेली गोष्ट करणे ते सुद्धा वेळेत पूर्ण करणे'. तिची दूरदृष्टी खूपच छान या बाबतीत. म्हणजे एखादा विशेष दिवस साजरा करायचा असेल, कुठे जायचं असेल काही कार्यक्रम-उपक्रम करायचा असेल तर महिनाभर आधी त्याची प्लॅनिंग, नियोजन, बुकिंग, आणि त्याची तयारी तिची झालेली असायची. मला कधीच अस जमलं नाही. म्हणजे एवढा कोण विचार करत. पुढच्या महिन्या-दोन महिन्यांत... 15-20 दिवसांत काय होईल काय नाही; परिस्थिती काय असेल, आधीच कस प्लॅन करायची, देव जाणे. आणि फक्त प्लॅन नाही 'जे ठरवलं ते ठरवलं'. मग 'ते मोडायचं नाही' हा हट्ट.

आजचा दिवस सुद्धा तिने तिच्या संकल्प वहीत लिहून घेतला होता तसाच पार पाडला. आणि तिने फक्त लिहून ठेवलं नव्हतं तर त्याची संपूर्ण तयारी देखील केलेली. संपूर्ण दिवस आखला होता. मला मात्र 2 दिवस आधी फक्त सांगितलं. मला समजत नव्हतं हा उपक्रम, प्लॅनिंग, तयारी कधी करणार. दोन दिवसानंतर करायचंय सगळं पण त्याचा विचार करण्याची मला गरज नव्हती. कारण आजच्या दिवसाची सुरुवात, सामाजिक उपक्रम आणि गोड शेवट सर्व काही तिने आधीच योजल होतं. त्यामुळे मला 'नाही' म्हणताच आलं नाही. आणि ती नेहमी असंच ऐन मोक्याकर १-२ दिवस आधी मला सांगते मात्र तिने तिचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्याची तयारी महिनाभर आधी केलेली असते त्यामुळे मला त्या गोष्टीसाठी वेळ काढणं भागच पडतं. आणि एवढी सगळी तयारी केल्यावर नाही म्हणायचा मुळात प्रश्नच उद्भवत नाही.

एखादी गोष्ट तिच्या त्या संकल्प वहीत उरतली मग तिथे अगदी 'प्राण जाये पर शान न जाये' अशा हट्टाने पूर्ण करायचं. याबाबतीत मग तडजोड नाही. जी गोष्ट स्वतःसाठी खासकरून माझ्यासाठी करायची अस ठरलं की मग त्याला वेळ, काळ किंवा इतर कुणी तिसऱ्या व्यक्तीच बंधन न मानता किंवा आमच्यात काही रुसवा-फुगवा जरी झाला असला तरी सर्व काही बाजूला ठेऊन ती पूर्णत्वास देण्याची तिची धमक कमालीची.

यातूनच ती तिची कला जोपासत मला छोट्या मोठ्या भेटवस्तू द्यायची. म्हणजे एखाद्या महागड्या गिफ्ट पेक्षा "स्वतः बनवलेली एखादी वस्तू किंवा ग्रीटिंग" किती मोलाची हे माझ्यापेक्षा दुसरं कोण जानेल. याबाबतीत तिने अगदी भेटवस्तूंचा सपाटाच लावला. अगदी वेळात वेळ काढून तिच्या दिवसभराच्या वेळापत्रकातून वेळ बाजूला ठेऊन ती फक्त माझ्यासाठी या साऱ्या गोष्टी करायची. तिची चित्रकला उत्तम! मग कधी त्या "चित्रातून आमचं भविष्य रेखाटायची" तर कधी मला लिखाण आवडत म्हणून एक "सुंदर ग्रीटिंग बनवून त्यावर मनातील भावना उतरवायची". हे ती जितकं मनापासून करायची तितकंच ते तिच्या त्या चित्रातून आणि कवितांतून दिसून यायचं. तिने दिलेल्या अनेक वस्तूंनी घराची शोभा वाढवली आहे. मला काय आवडेल काय नाही या कल्पनेतून ती भेट वस्तू बनवायची आणि माझी आवडनिवड जोपासायची ही तिच्या अंगी रुतलेली नवी कला. तिने साजरी केलेली 'आमची पहिली एनिव्हर्सरी' आणि खास कर माझा 'आमच्या नात्यातील पहिला वाढदिवस' माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. पण या आवडीनिवडी जपण्याच्या आणि भेटवस्तू देण्याच्या स्पर्धेत मला मात्र तिने मागे टाकलं. तिने दिलेलं 'कपल टी-शर्ट' आणि 'नंबर' जे सतत आमची ओळख एकत्र असल्याचं प्रतीक. हे मला कधीच शक्य नव्हतं. हॅट्स ऑफ बायडी!

या छोट्या छोट्या गोष्टी तर ती सुरुवातीपासून करतच होती. ज्यात आनंद आहे, क्षणिक आहेत, तात्पुरत्या आहेत, अशा गोष्टी करून थांबेल तर ती, ती कुठली! नात्यात फक्त प्रेम असून चालत नाही. ते प्रेम कायम फुलत राहण्यासाठी 'विश्वास जपणं', 'बोलण्यापेक्षा कृतीतून प्रेम व्यक्त करण', आणि सर्वात महत्वाचं 'नात्याचा विचार दूरपर्यंत करणं' हे तिचे उत्तम विचार.
खरंतर या साऱ्या गोष्टी 'मला फिलॉसॉफीकल वाटायच्या' आणि निम्म्या अर्ध्या तर डोक्यावरून जायच्या. पण तरी ती करतेय तर चांगलंच आहे, म्हणून 'मी हो ला हो' देतंच होतो. पण तिने त्या ठरवल्या आणि पूर्ण करून दाखवल्या. माझ्या सारख्या फाटक्या झोळीच्या माणसाला तिने सेविंगची सवयी लावली. 'तिचीचं कल्पना दर महा थोडे थोडे पैसे बचत करून भविष्य सुरक्षित करण्याची'. शिवाय वर्तमानात ही जगायच, मग खर्च होणारचं; पण सेविंगला हात न लावता 'खर्चासाठी वेगळं नियोजन देखील तिनेच केलं होत'. मला बस ठरल्याप्रमाणे वेळेत त्या गोष्टी करायच्या होत्या. याबाबतीत मी कधी विसरायचो, कधी राहून जायचं. मग मात्र तिचा रागाचा पारा कधी वर खाली व्हायचा. पण ते माझ्यासाठी आमच्या नात्यासाठीच होतं, म्हणून 'मी पलटून कधीच राग दिला नाही'. कारण योग्य ठिकाणी रागवल्यावर माझ्या रागवण्याला अर्थच नव्हता, याची मला बरी जाणीव होती.

ती माझ्यासाठी जगत होती. सोबत माझ्या कुटुंबातील माणसांचा सुद्धा विचार करत होती. "माझी नाती, माझं परिवार तिने आपलं मानलं होतं". सणावाराच आई-बाबांचे आशीर्वाद घ्यायला तर अनेकदा घरातील मुलीप्रमाणे जबाबदारी पार पाडायला ती हजर असे. 'माझ्या घरात कस वागावं आणि कसं बोलावं' हे तिला सांगण्याची मला कधीच गरज भासली नाही. तिच्या प्रेमाने तिने सगळ्यांची मन जिंकली.
उलट बाजूला मला मात्र फार काही करता आलं नाही. तिने सांगून शिकवून आणि मी केल्या नाहीत त्याहीपेक्षा हजार चांगल्या गोष्टी तिच्या नातलगांना सांगून माझं स्थान एका उंचीवर नेऊन ठेवलं. 'तिच्या मनात सोबत घरात पण तिने माझी जागा बनवली'.

या पलीकडे जाऊन तिचा एक गुणधर्म, 'तिने कधीच मला एकट नाही सोडलं'. सुखात एखादवेळी सहभागी झाली ही नसेल पण कठीण प्रसंगी कायम माझ्या पाठीशी नाही तर सोबत उभी राहीली. वेळ पडली तेव्हा रात्री अपरात्री जिथे असेन तिथे धावत माझ्याजवळ आली. आणि परिस्थिती सावरली.
"अनेकदा तब्बेत खालावली त्यावेळी मात्र तिने तिचा खंबीरपणा देखील दाखवला". स्वतःच घर नोकरी सांभाळत माझ्या तब्बेतीकडे बारीक लक्ष दिलं. आणि पुन्हा कधी अशी वेळ येऊ नये म्हणून बारीक सारीक गोष्टींची आजही काळजी घेते.

या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे ती स्वतःला पूर्णपणे विसरून गेलीय. फक्त आणि फक्त माझ्यासाठी. मी आयुष्यात आल्यानंतर ती तीच घर-परिवार, मित्र-मैत्रिणी, तीच स्वप्न सर्व काही विसरून गेलीय. तिच्या आयुष्यात आता फक्त मी आणि मीच उरलोय. तीच कुटुंब म्हणजे मी आणि माझ्यासोबत जे उभारेल तेच तीच घर. मित्र मैत्रिणी यांच्यासाठी आता तिच्याकडे वेळच उरत नाही, गप्पा गोष्टी, शेरिंग-केरिंग तिला सगळं माझ्यासोबतच करावं वाटत म्हणून तिने आज सगळ्यालाच पाठ फिरवली.

आणि स्वप्न मला तर माहिती ही नाही तीच स्वप्नं काय, तिला काय करायचं आहे आणि आयुष्यात कोणती उंची गाठायची आहे. मला ठाऊक ही नाही माझ्या भोवती घिरट्या घालणाऱ्या त्या डोळ्यांत सुद्धा काही स्वप्न असू शकेल.
कारण तीच सगळं आयुष्य पणाला लावून आज ती माझ्या स्वप्नासाठी झटतेय. माझ्या स्वप्नाची संपूर्ण जबाबदारी तिने तिच्या नाजूक खांद्यांवर उचलून धरलीय. कधी कधी मलाच भीती वाटते जर मी माझं स्वप्न पूर्ण नाही करू शकलो तर तिचं स्वप्न तुटेल, कारण "माझं स्वप्नं स्वतःचं करून" तिने तिच्या स्वप्नांची होळी पेटवली आहे. तीच स्वप्नं, तिच्या जगण्याचं कारण, तीची नाती गोती संपूर्ण आयुष्य एका बिंदूपासून सुरू होतं नि त्याचं बिंदू वर संपत आणि तो छोटासा बिंदू म्हणजे "मी".
म्हणून कधी कधी भीती वाटते तिच्या या खऱ्या, प्रामाणिक, आणि प्रमानाबाहेरच्या प्रेमाची. कारण तिच्यासारखं मी कधीच जगलो नाही आणि तिच्यासारखच जर मी भावनांनी विचारांनी स्वतःला नग्न केलं, तर हे नातं विस्कळीत होऊन जाईल....

(उर्वरित कथा भाग २ मध्ये)



Wednesday, December 26, 2018

दोस्ती

बरेच दिवस झाले, त्याचं लक्ष दिसत नव्हतं कशात. माझ्यासाठी तसा तो नवाच पण तरी सुरुवातीला थोडी तयारी आणि हुशारी दाखवली होती त्याने. पण आता Constantly तो घसरत चाललाय हे काही न कळण्यासारखं नव्हतं शिवाय त्याच्यात काहीतरी करण्याची जिद्द होती हे ही नजरेतून लपत नव्हतं. पण मग फक्त दहाच कसे?
दहावीच वर्ष म्हणजे तस बघायचं झालं तर आयुष्यातली पहिली महत्वाची पायरी. किमान त्यावेळी तरी आमच्यासाठी असंच सांगितलं जायचं. आता कदाचित हे शब्द नि असल्या व्याख्या बदलायला हव्यात; कारण त्यावेळी मी विद्यार्थी होतो आणि आता माझ्या विद्यार्थ्यांना हे पटेल, समजेल अशी आशा करणं म्हणजे मूर्खपणा ठरेल.

(illustration by Sandesh Rasal)

दिवाळी दरम्यान शाळेची सहामाही परीक्षा झाली. तसे आजकालचे विद्यार्थी, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आजची पिढीच तशी जरा उर्मट आणि उद्धटचं. आणि अभ्यास सोडून सगळ्यांतच यांची हुशारी. सर्व करून अभ्यासात अग्रेसर असणारे देखील अनेक आहेत. आमच्या वाट्याला नेहमी गाळच लागला. शेवटी शिक्षक म्हणून तो साफ करण्याची आणि नवनिर्माणाची जबाबदारी माझीचं.
सुट्टीनंतर बऱ्याच दिवसांनी तास भरला. नित्यनियमाने हजेरी वगैरेची औपचारिकता झाल्यानंतर सगळ्यांचे पेपर वाटून झाले. वर्गातून सगळी मुले-मुली बरे गुण मिळवून पास होती. माझ्या विषयातही चांगला निकाल होता. पण चार एक मुलं काठावर देखील पास नव्हती आणि त्यातलाच हा सलमान. वार्षिक परिक्षेच्या अनुषंगाने त्यांचा आताच कान पिळण गरजेचं होतं. एका कुणाला उद्देशून अपमानित करण्यापेक्षा (चूक दाखवणं हे आजकालच्या कारट्यांना अपमान वाटतो) मी सर्वांना उद्देशून काही मार्गदर्शन करू लागलो. त्या नापास विद्यार्थी आणि काही कमी गुण मिळलेल्या विद्यार्थ्यांमुळे तस माझ्याही मनाला लागलं होतं. मी भाऊक पणे एखादा बाप मुलाला ओरडावा तस बोलत होतो अगदी हक्काने. मी बोलत होतो, "अरे जराही लाजा नाहीत तुमच्यात हे असे मार्क्स मिळवून पास होणार आहात का बोर्ड एक्साम. अवघे तीन महिने उरलेत आणि ही अवस्था तुमची. कसे पास होणार. उद्या निकाल लागल्यावर रस्त्यात जेव्हा तुम्ही भेटता आणि त्यावेळी जेव्हा आनंदाने सांगता सर, हमे फस्ट क्लास मिला! तेव्हा आमची मान उंचावते पण तेच जर नापास झालात आणि तुमची नजर चोरटी झाली मान झुकली तर तिथे आमची मान शर्मेंन झुकते. तुम्हाला शिकायच नसेल तर कशाला इथं येऊन बसता. उद्या भीक मागायची वेळ येईल. तेव्हा आठवेल शिक्षणाच महत्व काय ते".
मी बरंच बोललो रागाने. त्यानंतर त्यांना पेपर कसा लिहावा यावर प्रकाश टाकला. मी थोडा तावातावातच होतो. माझं बोलून झालं, थोडं डोकं शांत ठेऊन सगळ्यांना शिक्षा म्हणून पेपर दोनदा लिहून आणायला सांगितला आणि माझा तास दोन कविता शिकवून पूर्ण केला.
सगळे विद्यार्थी निघू लागले. काही येऊन पुढल्या परीक्षेत जास्त गुण मिळवू अस आश्वासन तर काही कमी गुण मिळाल्याची कारणे देत होते. सगळे निघाले; तो शेवटच्या बाकावर तसाच बसून होता.
मी निघत असताना त्याने रस्ता अडवला आणि उद्गारला.
"सर दिल को लगी आपकी बात, आपने जो सर झुकाने और भीक वगैरा बोला, हमारी वजेसे..." सलमान.
"मग काय आरती करू का तुमची शंभरात वीस आणि पंचवीस गुण मिळवलेत म्हणून. ज्यावेळी तुम्ही विद्यार्थी म्हणून बाहेर पडता ना त्यावेळी तुमची ओळख अमूक शिक्षकाचा विद्यार्थी म्हणून होते. तुम्ही चुकलात बरोबर असलात तरी शिकवण आमचीच आहे हेच समजतात लोक. मग तुमच्या ह्या हलगर्जीपणाने तुमचं तर वर्ष आयुष्य फुकट घालवता सोबत आमचं मान-प्रतिष्ठा ही धुळीला मिळवता." मी जरा रागातच बोलत होतो.
त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो बाकावर बसला. म्हणाला, "सर, मे दिन भर बाईक पर घुमता रेहता हू. स्कुल भी कभी बंक करता हू. दोस्त है के छोड ते ही नहीं. पेहले होम वर्क करता था, थोडा बहोत घरपे पढता था, पर अब दिनभर उन दोस्तो के साथ घुमता रेहता हू.
माझी पावलं दारातून मागे फिरली. विषय गंभीर वाटत होता. मी त्यांच्या समोर बसलो. म्हटलं, "का? त्यांना नको म्हणता येत नाही. हाताला पकडून तुला फिरवतात का. लहान आहेस का आता."
"करता हू मना सर. कई बार किया मना तो फिर दोस्ती का वास्ता देते है, बस क्या यही दोस्ती? दोस्त के लिये ये नहीं कर सकता वो नहीं कर सकता. मतलब के मजबूर कर देते है के मै पुरा दिन उनके साथ रहू. फिर मुझे मना भी नहीं करने होता, उनको बरा लगेगा सोच के उनके साथ ही घुमता रेहता हू. और सच बोलू तो पिछले दो महिने से मैने एक दिन भी घर पे पढाई नहीं किई.", सलमान म्हणाला.
हे ऐकून पहिलं तर त्याचेच कान फोडावे वाटलं पण खरं बोलतोय आणि त्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी त्याला आताच योग्य मार्ग दाखवणं गरजेचं होतं. प्रॉब्लेम काय ते एव्हाना कळलं होतं. आता सोल्युशन द्यायला मला जमतंय की नाही ती माझी परीक्षा होती. मी सुरवात केली, "ते तुझे मित्र नाहीत".
"नहीं सर दोस्त ही है, मेरे साथ ही रेहते है", सलमान.
"मी बोलताना आता ऐकायचं फक्त, मला समजलं तुझं काय ते. आता माझं ऎक आणि नीट डोक्यात साठव."
"ठीक है, सर"

(illustration by Sandesh Rasal)

"वो तेरे दोस्त नहीं है, दोस्ती के बुरखे मे तेरे दुष्मन तेरे साथ है". तू ओळखायला चुकलायस. तुझ्या वयाला इतकी समज ही नाही म्हणा की काय योग्य-अयोग्य समजू शकेल."
"मित्र तो नसतो जो आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातो. मित्र तो नसतो जो संकटात टाकतो, मित्र कधीच आपल्याला चुकीचा सल्ला देत नाहीत, किंवा आपलं नुकसान होईल असं ही वागत नाहीत." तो आता कान टोचून ऐकत होता.
खरा मित्र आणि मैत्री मिळायला नशीब लागत. एकत्र राहील, एकत्र फिरलं नाहीतर एका वर्गात शिकलं म्हणजे तो मित्र झाला अस होत नाही. ती फक्त वाईट संगत आणि सोबत असते. जी काही काळासाठी असते. ती कितपत करावी ते ज्याचं त्याने ठरवावं." कदाचित सगळं त्याच्या डोक्यावरून जात होतं. तो नुसती ऐकण्याची भूमिका आता करत होता.
"तुझ्यासारखा मी पण एका बीएमसी शाळेत शिकलोय. चांगले वाईट..."
"क्या? सर आप बीएमसी?". तो.
"हा, तो इसमे क्या हुवा. वो स्कुल स्कुल नहीं होते. वहा पढाई नहीं होती. मी ही तुझ्यासारखा तसाच विद्यार्थी. आणि चांगले वाईट असे सगळे मित्र भेटले तिथेही आणि तिथून बाहेर पडल्यावर आजही. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर एक एक वाट्याडा भेटत गेला. ज्याने नातं जपलं, मन जोडलं तो मनात मित्र बनून राहिला. ज्याचा प्रवास संपला तो भूतकाळ बनून मागे सरला. प्रत्येक वाट्याडा वेगळा होता आणि तो माणूस वाईट नसतो रे त्याच्या सवयी चांगल्या वाईट असतात. त्यातल्या कुठल्या आपल्याला लावायच्या ते आपण ठरवायचं. दम मारायला चल, अड्ड्यावर चल, बसायला चल, असे सगळे अतरंगी मित्र माझेही आहेत. पण त्यातली ती वाईट सवयी सोडली तर त्यांच्यात चांगले ही गुण आहेत, काही कला आहेत खेळात हुशार आहेत. मी त्यांच्या बरोबर बसलो नसेन तरी खेळलो आहे. त्यांच्या सोबत पोरींची छेड काढली नसली तरी मुलींशी मैत्री केली आहे. शाळेत असताना शेवटची चार वर्षे तर शेवटच्या बाकावर बसून काढलीत पण आजही शाळेतला शिक्षक हुशार नाही पण चांगला विद्यार्थी म्हणून तरी ओळखतात."
"सर आप भी... फिर भी टीचर... मेरे भी दोस्त घुमाते है, कभी कोई मैदान, फिर वो दारू अड्डा, नाके पे, चाय की टपरी पे, उनके साथ उनकी बात नहीं मानी तो नाराज होते है और दोस्ती तोड रहा है बोलके करवा लेते है सब." सलमान म्हणाला.
"का विरोध करता येत नाही. तुझ्या या अभ्यासावर आणि आयुष्यावर त्याचा परिणाम होतोय हे समजतंय ना. जिथे योग्य तिथे वेळ दे, जिथे चुकीच किंवा पटत नाही तिथे सरळ विरोध कर मग अशी मैत्री तुटली तरी चालेल. सोबत राहून पाठीत वार करणारे शंभर मित्र जोडू नकोस. पर तेरे सुख दुःख मे हमेशा तेरा साथ दे, तुझे सही राह दिखाये और तेरे नुकसान के बजाये अपने साथ आगे बढणे का हौसला दे ऎसे चार दोस्त जरूर बनाना."
त्याला समजलं असावं असं चेहऱ्यावर दिसत होतं पण शब्दात काही उतरत नव्हतं.
"सर अच्छा हुवा आज आपसे बात करके दोस्ती का मतलब तो समझ सका", कोशीश करुंगा सर अब सही गलत समझने की, दोस्ती सबसे मगर रिश्ता कुछ अपनो से जोडने की और साथ मे अच्छी पढाई करने की", सलमान.
चला अर्धा तास रामायण वाचल्याचं समाधान मिळालं. मी हसलो आणि म्हणालो, "जा आता आणि परत असा मित्र भेटला की मला भेटायला आण, त्याला म्हणावं त्याच्या पेक्षा टपोरी फंटर है इधर".
तो हसत आणि विचार करत जड डोक्याने निघून गेला.
मागो माग मीही निघालो, तो नाक्यावर दिसला. लिफ्ट मागत होतो. मी जाऊन गाडी बाजूला थांबवल्यावर बसला आणि स्टेशन को छोडो भाईसाब म्हटला. मी काही न बोलता सोडलं. गाडीवरून उतरून तो थँक्स बोलून निघत होता. हेल्मेट काढल्यावर थांबला. "सर आप, सॉरी सर देखा नहीं मैने, वो सोच मे था तो बस बैठ गया... पर आप तो उस साईड जाते है फिर यहा... मी हेल्मेट घालत म्हटलं, "दोस्त वो नहीं होता जो तुम्हारा रास्ता बदले, बल्कि वो होता है जो तुम्हारे लिये अपना रास्ता बदले" आणि निघालो.
तो तिथेच उभा एकटक पाठमोऱ्या धावणाऱ्या गाडीकडे बघत पुटपुटला. एक सच्चा दोस्त मिल गया...

- रोh@nj



Monday, November 26, 2018

घटस्फोट...(शेवटचा अर्धा तास)

आमच्यातील वाद आता कायमचा संपला होता. अर्ध्या तासात कोर्टाकडून आदेश येईल आणि आम्ही...


"तू नेहमीच अस करतोयस. तुझा प्रॉब्लेम काय नेमका कळत नाहीय मला. लग्न झाल्यापासून मला विकत घेतल्यासारखा मालकी हक्क दाखवतोयस. माझं स्वातंत्र्य, माझं फ्रीडम, माझी लाईफ स्टाईल सगळं हिरावून घेतलयस तू. बांधून ठेवलायस मला. बस आता. मला माझं स्वातंत्र्य परत हवंय. I want Divorce."
त्याची पटकन मान माझ्याकडे फिरली. होकारार्थी मान हलवून तो घराबाहेर निघून गेला. मी बोलताना कसलाही विचार केला नाही. बस माझ्या डोक्यात संताप होता. मनात राग होता. जिभेवर ताबा नव्हता. शब्द फेकत होती मी फक्त त्याच्या दिशेने. मी दारूच्या नशेत होते. पण तो काहीच का नाही बोलला. आज त्याने ना वाद घातला ना आपली बाजू मांडली. माझ्या निर्णयावर फक्त शिक्कामोर्तब करून निघून गेला.

श्री च्या बड्डे दिवशीचा वाद आणि आमचं बोलणं कदाचीत शेवटचं. आम्ही पार्टीहून आलो आणि त्याने घरात तमाशा केला.
"तुला कितीवेळा सांगितलं हे असले कपडे घालू नको, तुला सांगितलेल कळत नाही".
"का काय वाईट आहे या कपड्यात, कोणी घालत नाहीत का वन पीस किंवा वेस्टर्न ड्रेसेस. मी घातला तर काय बिघडलं आणि यापूर्वी कधी घातला नव्हता का? लग्नाआधी घातला नव्हता का?
"कपडे घालण्याचा किंवा तुझ्या आवडीनिवडीचा मला काही प्रॉब्लेम नाहीय. पण कुठे कस राहावं याचं भान विसरलीयस तू. तुझी आवड निवड आहे; मान्य य ना मला आणि ती जप तू, पण ते माझ्याजवळ किंवा जिथे आपली माणस असतील तिथे. चार चौघात आवड निवड नाही संस्कार आणि चारित्र्याच्या दृष्टीने पाहिलं जातं."
"वाह... लोकांची ही भीती तुला कधीपासून वाटू लागली रे. बोलणारे बोलणारच पण तुही त्यांच्यासारखा वागशील का? लग्नाआधी तरी तुला या गोष्टीचा प्रॉब्लेम नव्हता. एका मंगळसूत्राने इतका काय फरक पडला."


"खूप फरक पडतो मेघना! खूप फरक पडतो. हा फरकच तुला समजत नाहीय, म्हणून आज ही वेळ आलीय.
चार चौघात जिथे वेगवेगळी नाती माणसं एकत्र येतात तिथे तुझ्या फ्रँकली बोलण्याला तुझा उद्धटपणा समजला जातो. मॉडर्न कल्चर नुसार वागण्याला चारित्र्यावर प्रश्न केला जातो.
बोलणारे बोलतील... तुझं खाणं... पिनं... बोलणं... त्यांच्यापुढ्यात राहणं या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारीक लक्ष असत... पण तुला काहीच फरक पडत नाही. पण मला पडतो;
कारण तुझ्या फ्रँकली वागण्याला आणि चांगुलपणाला समोर वाह वाह करणारे तुझ्या मागे जेव्हा तुझी निंदा करतात.. तुला उद्धट म्हणून हिनवतात... त्याचा या कडू शब्दांचा मला फरक पडतो...

जेव्हा तू मॉडर्न विचारांनी त्यांना समोर जातेस आणि लोक पुढ्यात कौतुक करून मागे तेच लोक तुझ्या पाठीवर तुझ्या आईवडिलांचे संस्कार काढतात... त्याचा मला फरक पडतो...

जेव्हा तुला मॉडर्न लूक मध्ये बघून ब्युटीफुल, सुंदर म्हणणारे तुझ्या अर्धनग्न छाताडावर वाकडी नजर फिरवतात...
तू पाठ फिरवल्यावर त्याच तुझ्या अंगावरच्या तिळाबद्दल गॉसिप करतात...
त्यांच्या या वाकड्या नजरेचा मला मला फरक पडतो...
फरक पडतो मला...
तुम्हा बायकांना रूपाबद्दल, सुंदरतेबद्दल कौतुक ऐकायला आवडत म्हणून हा नटा पटा ना... मग आपल्या दोन चार माणसापर्यंत हरकत नाही... पण जगासमोर का? त्यांच्या कौतुकाची भूक का?
या सगळ्याचा तुला नाही ग पण मला त्रास होतो, मला फरक पडतो. कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याबद्दल एकजरी चुकीची गोष्ट कानावर पडली.. तरी मला त्रास होतो... मला फरक पडतो कारण तू माझी आहेस आणि तुझ्याबद्दल अस ऐकणं काळजाला भोकं पाडून जात. तुझ्याबद्दल लोकांच्या तोंडून वाईट नाही ऐकू शकत मी. तुझी निंदा नालस्ती नाही सहन होत. तुला कोणी वाईट समजावं अस नाही वाटत मला. म्हणून फरक पडतो मला...
पण तुला काहीच फरक पडत नाही याचा, कळलं मला...
आणि हो मी आजही तोच आहे जसा होतो तसा तुझाच. लग्नाआधीही आणि नंतरही. थोडी मागे जाऊन आपलं नातं पाहिलस तर उत्तरं तुलाच भेटतील..."
"तुला त्रास होतो, तुला फरक पडतो मग सोडून का देत नाहीस मला. माझा लाईफची वाट लावलीयस तू. बदलला नाही म्हणतोस बघ हा तुझ्यातला बदल. तू असा नव्हतास रोशन. कोणत्या काळात जगतोयस, विचार बदल तुझे, मूर्खाचा बाजार लावलाय सगळा"
माझी चिडचिड आणि संतापलेली मी माझा माझ्यावरच ताबा नव्हता. विस्तवावर पाय ठेऊन आतल्या आत जळावं तस मी नशेत जळून निघाले होते. त्याने सांगितलेल्या चांगल्या गोष्टीही मला शिव्या वाटत होत्या. त्याचं माझ्यावरचं प्रेम आजही तितकंच आहे आणि त्याच प्रेमापोटी आणि काळजी पोटी तो नेहमी मला सांभाळून घेतो. मी अशी वेडी वाकडी असताना माझी प्रत्येक बाजू सावरतो. समजून घेतो. समजून सांगतो पण मी आजही तशीच पहिल्यासारखी बिनधास्त बेफिकीर. आणि त्याने खरं तर मला कधी अडवलं ही नाही. पण मागच्या महिन्यात श्रीच्या बड्डे दिवशी रात्रभर झालेला हा वाद आमच्यातला शेवटचा. आणि कदाचित तो संवाद ही शेवटचाच!

मात्र आठवड्याभरापूर्वी झालेल्या एकमुखी वादात त्याने हार मानली. त्याची काळजी आणि प्रेम कदाचित दिसून ही समजत नव्हतं. आणि तो निःशब्द झाला. मी दारूच्या नशेत होते. मला भान नव्हतं. त्याला घालून पाडून बोलले आणि त्याच्यावरच आरोप केला; माझं स्वातंत्र्य हिरावण्याचा. त्याने फक्त त्यावर होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाला तुला सोड हवी ना.
ठिकय, उद्या साइन केलेले डिओस पेपर पोहचतील तुझ्याजवळ.
आणि निघून गेला. सकाळी पेपर माझ्याकडे होते.

आज आठवडा झाला या गोष्टीला. मला खरंच समजत नाहीय मी काय केलं कस वागले. आज माझा संसार मोडकळीस आलाय. त्याच्याशिवाय हा आठवडाच मला जगणं कठीण झालं होतं. मी पुढे कशी जगू त्याच्याशिवाय. मला गरज होती त्या ठिकाणी माझं अस कुणीच नसताना प्रत्येक गोष्टीत तो होता माझ्यासोबत. त्याची हीच काळजी, हेच प्रेम, समजूतदारपणा पाहून मी त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्याच प्रेमाला मी बंधन समजून, ओव्हर पझेसिव्ह समजून त्याला दुखावलं. त्याने मला खरंच बंधनात ठेवलेलं का? मी स्वातंत्र्य आणि मर्यादा समजून घेण्यात चुकले तर नाही ना?


पण लग्नापूर्वी हे अस नव्हतं. असं ही मला वाटत होतं.
मला अजून आठवतंय पिकनिकला गेल्यावर कधीही ड्रिंक न करणारा हा माझ्या आग्रहाखातर पहिल्यांदा प्यायला होता. त्यानंतर पुनः त्याला नको वाटलं ड्रिंक. पण त्याने मला तर कधीच अडवलं नाही. फक्त त्या रात्री काय झालं आठवत नाही, सगळ्याग्रुप सोबत होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो एवढंच म्हणाला आता जेव्हा कधी हवी असेल फक्त माझ्यासोबत किंवा मी सोबत असेन तेव्हाच ड्रिंक कर. पण नको म्हणाला नव्हता.
कधीतरी गंमत म्हणून सिगारेटचा धूर ही काढला होता. तेव्हा तर उलट मला एकटीला कॉलेजच्या गच्चीवर इतकं रोमँटिकली उचलून नेलं होत आणि एक पॅकेटच हातावर ठेवलं होतं, घे फुक.
क्वचित तिथेच त्या सोबत काढला धूर दोघांनी. पण तेव्हा ही ना-नको-नाही काहीच नव्हतं.
त्याला मला साडीत पाहायला फार आवडत. साधं सरळ पंजाबी ड्रेस, मोकळे केस, कपाळावर बारीकशी टिकली अस कधी पुढ्यात आलं की एकटक वेड्यासारखा बघत राहायचा. पण त्याची आवड त्याने माझ्यावर कधीच लादली नव्हती. ना कधी कॅज्युअल घालण्यापासून अडवलं, ना मला हवे तसं वेस्टर्न ड्रेसेससाठी अडवलं. फक्त कधी कधी काही ठिकाणी किंवा विशेष एखाद्या दिवशी काही असेल तर आधीच सांगायचा. आज तो ड्रेस घाल वगैरे. मला ही आवडायचं त्याच्या पसंतीनुसार कधीतरी कडपे घालून वावरायला.
लग्नाआधी इतकं समजून घ्यायचा मग आता का असा वागतो. त्यावेळी मला दिलेलं स्वातंत्र्य तो अस कस हिरावून घेतोय. त्यावेळी प्रत्येक गोष्टीत तो २४ तास माझ्यासोबत असायचा...
प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत सोबत असायचा...
सोबत असायचा.... (अचानक चटका बसल्यासारखे सगळे विचार थांबले... एकच शब्द जिभेवर राहिला... सोबत असायचा)
तो सोबत होता. प्रत्येक वेळी. मी चूक केली तेव्हा मला सावरायला. ती सुधारयला. मी माझ्या नशेत असताना माझी काळजी घ्यायला. त्याने मला कधीच अडवलं नाही पण कधीच काही वाईट परिणाम नको म्हणून एकटही सोडलं नाही. त्याने माझ्या नकळत माझ्या मर्यादा कित्येक वर्षे जपल्या. आणि त्या मर्यादांना बंधनं समजून त्यावरच स्वातंत्र्य हिरावल्याचा आरोप करून त्याच्या प्रेमाचा अपमान केला.
मी चुकले. आज नाही नेहमीच. पण नेहमी सारख त्याने समजवल का नाही यावेळी. तो गाजवत असलेला हक्क आणि बंधन समजून घेता आल नाही मला. आणि माझं स्वातंत्र्य आणि मर्यादा यातला फरक ही नाही जपता आला.
मी ईथे कोर्टाबाहेर बसून आता विचार करतेय. स्वतःच्या चुकांचे पहाडे मोजतेय. माझ्या डाव्या बाजूला एक दरवाजाय जिथे न्यायाधीश बसलेत आमच्या संसाराची पत्रावळी वाचत. आणि उजवीकडे एक ज्या पलीकडे एखाद्या किनाऱ्यावर बसून तो लाटांशी बोलत असणार.
(मोठी घंटा वाजते. केससाठी आत बोलावणं येतं)

 आणि  आमच्यातील वाद आता कायमचा संपला होता. अर्ध्या तासात कोर्टाकडून आदेश येईल आणि आम्ही...
दोन मार्ग. एक निर्णय.
आणि शेवटचा अर्धा तास!

- रोh@nj



Saturday, September 22, 2018

बाप्पाचा मेल आलाय...

प्रिय भक्तांनो,

          मला मानणाऱ्या न मानणाऱ्या समस्त पृथ्वी तलावर वावरणाऱ्या माणसंहो... गेल्या ११ दिवसांत तुमच्या भक्ती सोबत इतर अनेक गोष्टी माझ्याजवळ पोहोचल्या आणि न राहून हा मेल तुम्हाला पाठवावा म्हटलं. मेलंचं योग्य म्हटलं म्हणजे तो तुम्ही अगदी सहज स्मार्ट फोनवरही वाचाल आणि माझ्याचं नावाने ११ जनांना पाठवालं आणि नाही पाठवला तर अपशकुन होईल असा जगभर बोंबाटा करत सुटाल. नाहीतर आज्ञापत्र पाठवावं तर ते फरमान वाचायला तुम्ही वेळ द्याल की नाही कुणास ठाऊक याची वेगळी भीती.


          तर सुरूवात करतो माझा शाखा विस्तार केलात तिथून. म्हणजे पूर्वी २-४ किमी अंतरावर माझी स्थापना होती तर आता चौकाचौकात तूम्ही अमूक तमूक मंडळाच्या नावाने मला नेऊन ठेवता. वर त्यात भेदभाव ही तुम्हीच करता. पाहिलं तर सगळीकडे मीच; पण त्या पर्टिक्यूलर ठिकाणीच तुम्ही नवसाचा राजा म्हणून मला घोषित केलात. बरं आता तुम्हाला कितीही समजून सांगितलं तरी कळेना, "मी देवाऱ्यात नाही तुमच्या मनात वसतो". पण शेवटी तुम्ही मला दगडात आणि मूर्तीत शोधता आणि नवसाला पावणारा म्हणून त्यातल्याच एकाला घोषित करता. आता मला सांगा या सगळ्यांचं हेड आॅफिस तर मीच चालवतो. मग तुमच्या घरातला मी आणि त्या मंडपातला मी यात भेद का बरं? त्यापेक्षाही सांगायच तर मनात डोकवा तिथेही मीच आहे.

आणि नवस म्हणजे काय हो लेकरांनो. तुमची एखादी इच्छा मांडता बदल्यात मलाच काहीतरी अमिष दाखवता आता तुम्ही मला सोनं, चांदी, ५-२५ नारळं वाहणार ते घेऊन मी कुठं बरं जाणार. स्वर्ग लोकांत या साऱ्याची बिलकुल गरज नाही मला. इतकं सारं ओझं, सोन, चांदी, पैसे, अमाप संपत्ती तुम्ही माझ्या वेगवेगळ्या शाखांत भरता पण कधी पाहिलात का मला ती घेऊन जाताना? नाही ना! मग मी मागितलं नसताना का बरं देता?

मला तुमच्या भक्तीची अन् मोदक, जास्वंदाची तेवढी भूक. तेही तुम्ही २१ मोदक देता ते जेव्हा २१ भक्त ग्रहण करतात तेव्हाचं माझ्या पोटी लागतं. इतर मला काही नको असतं. आणि राहिल्या तुमच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न जर ती योग्य असतील तर नक्कीच पूर्ण होतील. त्यासाठी माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतोच. पण तुम्ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावर किंवा नशीबावर टाकाल तर मी तरी काय करणार यात.


अभ्यास न करता विद्यार्थ्याला निकाल कसा लाभणार. किंवा डाॅक्टरी इलाज न करता एखादा आजार बरा कसा होणार. माझा वाटा केवळ १ टक्का बाकी तुमचे प्रयत्न असावेत. तुमच्या प्रयत्नाला माझी साथ असतेचं.
पण तुम्ही मला नवस बोलायला माझ्या शाखाही स्वतः ठरवता. तासनतास लाईनही तुम्हीच लावता आणि पुन्हा त्यात वादविवाद करून भांडताही तुम्हीच. मग कधी पोलीसांवर हल्ला तर कधी कार्यकर्त्यांवर. पण या सगळ्यांत माझा भक्त कुठेय?
बरं मग त्यातही तुम्ही नवसाची रांग, तर कुठे वि. आय. पी. तर कुठे पास विकुन रांग लावता. माझ्यासाठी सारे सारखेच तुम्ही बाळांनो. मी कधी भेद नाही केला. मग तुम्ही का अस विभागून येता माझ्याकडे...
या रे या सारे या... एक दिशेने एक मताने या...

आणि हे... हे बघा! आता यावर काय बोलू मी. अरे माझी उंची तुमच्या एवढीचं. त्यात हे उंदीरमामा आमचे एवढेसे. माझ्या ६ फुटाचे १२-१५ केलात तीथवर ठिक. हळूहळू वाढवत आता २२-२५-३० फूटावर नेऊन ठेवलात माझी उंची. अरे इतक्या वरून माझ्या भक्तांना पाहताना किती त्रास होतो मला आणि त्यात तुम्ही आधार देऊन उभ करता आणि त्यात माझा तोल जाण्याची ही भीती. एक अपघात ओढवला होता, आठवतय ना...


माझ्या किर्तीची उंची तुमच्या मनात साठवा पण मूर्ती मात्र जरा मापातचं असू़द्या... त्यात त्यांच्याचौकात इतकी मोठी म्हणून आपल्या चौकात चार फूट वाढवून बसवू नका. त्रास शेवटी मलाच होतो. आणि नको त्या गोष्टीत का म्हणून तुम्ही स्पर्धा करता. मूर्तीची उंची, मंडळाचे नाव, आगमन, विसर्जन, नवसाला पावणारा अरे या साऱ्यात स्पर्धा कशासाठी.
सामाजिक उपक्रमांत स्पर्धा करा, चलचित्र देखाव्यात स्पर्धा करा, ज्या स्पर्धांतून समाजहित साधेल, सामाजिक उपदेश जाईल, सत्कार्य घडेल. अशा स्पर्धा करा. त्यांनी एक सत्कार्य केले तुम्ही चार करा. पण तुम्ही अडता फक्त मंडळाच्या खोट्याा प्रतिष्टेसाठी. आणि लावता मग आगमन, विसर्जन अन् कोणी मुंबईचा तर कोणी नवसाचा राजा. हे एवढ मार्केटिंग कशासाठी हवं मला. माझे काॅपीराईट आणि ट्रेडमार्क घेण्याइतपत तुम्ही मोठे झालात का?

डिे.जे., ढोल यांच्या प्रमाणा बाहेरील धिंगाण्यात गर्दी वाढवून काय सिध्द करायचंय तुम्हाला... परवा आगमनाला काय झालं पाहिलात? मी शांतच बसलो होतो. कोण कोण कुठून लांबून आलं होतं. मला पाहण्यासाठी कि नुसत त्या गर्दीत उड्याामारून नाचण्यासाठी? रोड डिवायडर, सरकारी बस, प्रायवेट गाड्याा सगळ्यांवर चढून बसलात तुम्ही. शेवटी काय लागलं हाती...
सामान्यांची चेंगराचेंगरी, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि कलाकारांनी सादर केलेल्या वास्तू जमीनदोस्त. यावर तातडीने उपाय करत माझ्या भक्तांनी आपली चूक सावरली खरी, त्याच मला अपु्रपच आहे. पण याला जबाबदार कोण? मी की तुम्ही?


वरून घडलेल्या घटनेचा अपप्रचार करून तुम्ही माझचं नाव अगदी धुळीस मिळवता. एखादी दुर्घटना किंवा तुमच्या वागणुकीने घडलेली चूक तुमच्यातलेच काही हितचिंतक तातडीने फोटो काढून त्यावर भरमसाठ काहीतरी लिहून मोकळे होतात. आणि जाहिर करतात हाच का गणेशोत्सव? हीच का श्रध्दा?
म्हणजे चूक करणारेही तुम्हीच आणि प्रश्न करणारेही तुम्हीचं. पण अशाने तुमच्याच समाजात आस्तिक-नास्तिक आणि जाती विरूध्द दंगे होण्याची मलाचा अमाप भिती. कारण अशा संवेदनशील गोष्टी योग्य पध्दतीने पोहचवणारा हितचिंतक असतो पण त्याचा वणवा पेटवून परिस्थिती बिघडू पाहणारा हा समाजकठंक असतो.
अशी विचारधारा असणारे अस वाटतं माझं अस्तित्व मिटवण्यास जणू वाटचं पाहत असतात.

          आता कालचं आमच्या नारदमुनींनी एक विडीयो पाहिला. त्यात चौपाटीवरील विसर्जनानंतरचे दृष्य कैद होते जे अतिशय दुदैवी परिस्थिती मांडत होते. शिवाय एक असही चित्र होते कि एका भल्या मोठ्या ट्रकमध्ये माझ्या असंख्य मुर्त्या एका खाडीत फेकल्या जात आहेत. खर तर हा अनुचित आणि चुकीचाच प्रकार. उत्सवाचं हे रूप पाहिल्यावर कोणीही टिका करणारचं. पण ते सोशलमिडीयावर वायरल करून काय बरं साध्य होतं? म्हणजे करणारे ही तुम्हीचं आणि दाखणारे ही तुम्हीच. त्यावरचे उपाय का नाही बरं करतं. तुमच्या संपूर्ण गाव-शहराच्या लहान आणि मोठ्या माझ्या प्रतिमूर्ति तूम्ही चौपाटी व समुद्रकिनारी विसर्जित करता त्या पी.ओ.पीच्या अविघटक मुर्त्यांचं ग्रहण समुद्रदेव किती बरं करणार. त्यांनाही पाण्याखालील जीवसृष्टीची काळजी असेलच की, मग या साऱ्या लहान मोठ्याा मूर्ति समुद्र देव किती अन् कशा उदरात सामावून घेणार. त्या पुन्हा किनाऱ्यावर येणारचं आणि तिथून उचलून एखाद्याला त्याची पुन्हा विल्हेवाट दुसऱ्या ठिकाणी लावावी लागणारचं.


विसर्जनानंतर जणू त्यातलं अस्तित्व संपूण तो पुतळा कसा कुठेही भिरकावला गेला तर यात नवल काय हो? कारण तुम्हाला ही संपूर्ण सृष्टी, हीची काहीच पर्वा नाही. नाहीतर तुम्ही माझ्या लहान आणि इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना करून, कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचा समतोल राखणारा उत्सव साजरा केला असता. पण तुम्ही एका हाताने चुक करता अन् दुसऱ्या हाताने तेच फोटो काढून त्यावर टिका करता, गालबोट मात्र मलाचं लागते. हाच का टिळकांचा गणेशोत्सव.


         टिळकांनी असा कधी स्वप्नातही विचार केला नसेल बाळांनो असं विचित्र रूप तुम्ही माझ्या उत्सवाला आणलयं. मला आठवतयं लोकमान्य टिळकांनी १८९३ साली घरातला सण दारात आणला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप दिलं. स्वातंत्र पूर्व काळात लोकांनी एकत्र यावं, स्वतंत्र्याची धोरणं आखावित क्रांतिकारक योध्दे तयार व्हावेत; अशी सुगम, स्वच्छ धारणा त्यामागे होती. समाज हिताची विचारसारणी होती. उत्सवाला सांस्कृतिक आणि सामाजिक धारणा होती. पण आज हे सारं चित्र बदललयं भक्तांनो. हे थांबायला हवं. माझ्या नावाने चालणारी ही स्पर्धा, मार्केटिंग अन् खोट्या भक्तीची दुकानं बंद करा. वेळ आहे तोवर सावरा. नाहीतर प्रलय येईल. तेव्हा विघ्नहर्ता म्हणून मला काहीच करता येणार नाही. कारण तेव्हाही तुम्ही एकजूटीने बदलण्याचा नाही, तर प्रत्येक चौकातल्या मंडपाच्या माझ्या मूर्तीतच मला शोधाल आणि मी मात्र इथे तिथे कुठेच नसेन कारण मी फक्त एक दिव्य शक्ती आहे. जी सर्व निसर्गात आहे अन् तुमच्या मनात आहे. तर ओळखा माझं खर रूप आणि बदला हे उत्सवाचं स्वरूप.

तुमचा लाडका बाप्पा...